टप्प्याटप्प्याने बहाल होणार रेल्वे सेवा; रेल्वेकडून संकेत


नवी दिल्ली – सध्या देशभरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २१ दिवसांचा लॉकडाउन असल्यामुळे रेल्वे वाहतूक पूर्णपणे बंद आहे. पण रेल्वेकडून लॉकडाउन संपल्यानंतर सेवा पूर्ववत करण्याची तयारी सुरु झाली आहे. पण, यावर केंद्र सरकारकडून अद्याप कुठलाही अंतिम निर्णय झाला नसल्याचे वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिले आहे.

रेल्वे बोर्ड लॉकडाऊन संपल्यानंतर काय करायचे या सरकारच्या आदेशाच्या प्रतिक्षेत आहे. पण रेल्वे मंत्रालयाने तत्पूर्वी विभागीय रेल्वे बोर्डांना रेल्वे सेवा पुन्हा सुरु करण्याच्या नियोजनाबाबत विचारणा केली आहे. यामध्ये १४ एप्रिलनंतर टप्प्याटप्प्याने रेल्वे वाहतूक बहाल करण्याचा सल्लाही देण्यात आला आहे. त्याचबरोबर रेल्वे मंत्रालयाकडे याबाबतचा अहवाल पाठवण्यासही सांगितले आहे. रेल्वे झोन्सच्या अधिकाऱ्यांनी या माहितीला पुष्टी दिल्याचे इंडियन एक्स्प्रेसने आपल्या वृत्तात म्हटले आहे.

रेल्वे मंत्रालयाकडून आम्हाला तयारीत रहाण्याच्या सूचना मिळाल्याचे रेल्वे विभागांनी म्हटले आहे. दरम्यान, जर विभागीय मंडळांकडून सुरुवातीला २५ टक्के सेवा सुरु करुन त्यानंतर टप्प्याटप्प्याने ती ५० टक्क्यांपर्यंत नेण्याची क्षमता असेल तर त्याबाबत रेल्वे मंत्रालयाला सूचित करण्याचे या विभागीय मंडळांनी निश्चित केले आहे. पण, हे सर्व सरकारच्या लॉकडाउनच्या धोरणावर अवलंबून आहे.

रेल्वेने लॉकडाऊननंतर आपल्या सर्व सेवा २२ मार्च २०२० च्या मध्यरात्रीपासून बंद केल्या आहेत. या काळात फक्त ज्या रेल्वे गाड्या त्यांच्या शेवटच्या स्टेशनपर्यंत पोहोचल्या नव्हत्या त्यांना तिथंपर्यंत पोहोचण्यासाठी परवागनी देण्यात आली होती. दरम्यान, १५ एप्रिलपासून शंभर टक्के रेल्वे सेवा सुरु करण्याबाबत अद्याप मंत्रालयाशी बोलणे झाले नसल्याचे विभागीय मंडळातील अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. तरी लॉकडाऊन संपल्यास १५ तारखेपासून १३,००० ट्रेन्स सुरु होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.

Leave a Comment