दूरदर्शनवर पुन्हा येणार रामायण, महाभारत


फोटो सौजन्य युट्यूब
दूरदर्शनवर कोणे एके काळी लोकप्रियतेच सर्व उच्चांक मोडलेल्या रामायण आणि महाभारत या मालिका पुन्हा एकदा प्रसारित केल्या जाणार असून त्यासाठी करोना हे कारण ठरले आहे. देशात सर्वत्र लॉक डाऊन केला गेल्याने लोकांना घराबाहेर पडणे अवघड झाले आहे. करोना प्रसारामुळे उद्योगधंदे बंद आहेत तसेच बॉलीवूड आणि टीव्हीसाठीचे शुटींगही बंद पडले आहे. नवीन चित्रपट जसे रिलीज होत नाहीत तसेच टीव्हीवर मालिकांचे नवे भाग प्रसारित होऊ शकत नाहीत. पुढच्या भागांचे शुटींगच होऊ शकत नसल्याने ही परिस्थिती ओढवली असून ती अजून किती दिवस राहील हे आत्ताच सांगता येणार नाही.

या परिस्थितीत प्रसारभारतीचे शशीशेखर यांनी एका युजरच्या प्रश्नाला ट्विटरवर उत्तर देताना ही बातमी दिली आहे. या मालिका दूरदर्शनवर रिपीट टेलीकास्ट केल्या जातील आणि त्याचा टाईम स्लॉट लवकरच जाहीर केला जाईल असे म्हटले आहे. या युजरने दूरदर्शन या मालिकांचा रिपीट टेलीकास्ट करू शकेल का असा प्रश्न विचारला होता. यामुळे ज्येष्ठ व्यक्तींना पुन्हा एकदा या मालिकांचा आनंद घेता येईल आणि नव्या पिढीलाही ज्ञान मिळेल असे लिहिले होते.

एक काळ असा होता की रामानंद सागर यांच्या रामायणाने आणि चोप्रा यांच्या महाभारतने अफाट लोकप्रियता मिळविली होती. रविवारी सकाळी या मालिका प्रसारित केल्या जात तेव्हा अनेक प्रेक्षक भक्तीभावाने टीव्ही समोर उदबत्ती लावत असत आणि मालिकातील कलाकारांना खरे देव मानत असत. या मालिका सुरु झाल्या की रस्ते लॉकडाऊन असल्याप्रमाणे निर्जन बनत असत.

Leave a Comment