केंद्र सरकारने १५ एप्रिलपर्यंत रद्द केले सर्व पर्यटक व्हिसा


नवी दिल्ली – कोरोना पीडितांची देशभरातील संख्या दिवसेंदिवस वाढत असून आत्तापर्यंत ६८ रुग्ण देशभरामध्ये आढळून आले आहेत. केंद्र सरकारने या पार्श्वभूमीवर कडक निर्बंध लागू करण्यास सुरुवात केली आहे. केंद्र सरकारने सर्व परदेशी व्हिसा भारताने १५ एप्रिलपर्यंत रद्द केले आहेत. त्याचबरोबर देशाच्या सीमाही बंद केल्या आहेत. आरोग्य मंत्री केंद्रीय स्तरावर अनेक बैठका घेत असून परिस्थितीवर बारकाईने नियंत्रण ठेवत आहेत.

केंद्र सरकारने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी साथीचा आजार कायदा १८९७ मधील तरतुदी लागू करण्याचा सल्ला दिला आहे. त्यानुसार राज्य सरकार नियमावली जारी करू शकते. राजनैतिक अधिकारी आणि इतर ठराविक संघटनांचे अधिकारी वगळता व्हिसा १५ एप्रिल २०२० पर्यंत रद्द करण्यात आला आहे. हा निर्णय १३ मार्चपासून लागू होणार आहे. व्हिसा फ्री प्रवेश असणाऱ्या भारतीय वंशाच्या (ओव्हरसीस इंडियन) नागरिकांना दिली जाणारा सुविधाही थांबविण्यात आली आहे.

हे सर्व निर्णय कोरोना आजार नियंत्रणात आणण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या केंद्रीय मंत्रीगटाच्या आढावा बैठकीत घेण्यात आले. परिस्थितीचा या बैठकीत आढावा घेण्यात आला असून प्रशासकीय सज्जतेवर चर्चा करण्यात आली. आधीच भारतीय अर्थव्यवस्था मंदीत सापडलेली आहे. त्यात पर्यटकांना येण्यास बंदी केल्यामुळे अर्थव्यवस्थेचे नुकसान होणार आहे. पुढच्या महिन्यात आयपीएल देखील सुरू होणार आहे. या स्पर्धेचे आयोजनही धोक्यात आले आहे. राज्य सरकारांनी नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. मोठ्या प्रमाणात जनजागृती अभियानही राबवण्यात येत आहे.

सर्वाधिक कोरोनाचा प्रसार १५ फेब्रुवारीनंतर झालेल्या देशांतून भारतात आलेल्या नागरिकांना अलिप्त ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. चीन, इटली, इराण, दक्षिण कोरिया, फ्रान्स, स्पेन, जर्मनी या देशांतून आलेले पर्यटक, भारतीय नागरिक यांना १४ दिवस अलिप्त ठेवण्यात येणार आहे. १३ मार्चपासून हा निर्णय लागू होणार आहे. कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची परवानगी द्यावी, असा निर्णयही बैठकीत घेण्यात आला.

Leave a Comment