सावरकरांचे अस्पृश्यता निवारणातील कार्य फुले-आंबेडकरांच्या तोडीचेच – शरद पोंक्षे


सोलापूर – डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्यापेक्षा सावरकर हे श्रेष्ठ असल्याचे आपण कधीही म्हटलेले नाही. पण, काहीजणांनी आपल्या भाषणाला आलेल्या लोकांना किंवा आपल्याला न विचारता, नीट माहिती न घेता ब्रेकिंग न्यूज देण्याच्या घाईत, तशी बातमी लावली. त्यावर काही जणांनी जे स्वतःला साहित्यिक म्हणून घेतात, त्यांनी आपल्यावर वैयक्तिक टीका टिप्पणी करणाऱ्या प्रतिक्रिया दिल्या.

हे सर्वकाही ऐकल्यानंतर मन खिन्न होते. हे एकून मी काय करणार? माझ्या हातात स्वतःचे वर्तमानपत्र नसल्याचे मत ज्येष्ठ अभिनेते हे शरद पोंक्षे यांनी मांडले. महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तोडीचेच अस्पृश्यता निवारणामध्ये सावरकरांचे कार्य आहे. पण, ज्यांना ब्रेकिंग न्यूज द्यायच्या आहेत, ते जाणीवपूर्वक बहुजन आणि ब्राह्मण समाजाविरुद्ध द्वेष वाढेल अशा पद्धतीने बातम्या देतात. लोक अशा बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर मला दुसरी बाजू न विचारताच त्यावर रिअॅक्शनही देतात. हे अत्यंत क्लेशदायक असल्याचेही पोंक्षे म्हणाले.

पोंक्षे सोलापूरात अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने आले होते. त्यावेळी माध्यमांनी त्यांना सावरकर आणि शाहू महाराज-आंबेडकर या विषयाच्या अनुषंगाने वादग्रस्त वक्तव्याबद्दल विचारले असता हा खुलासा त्यांनी केला. नथुराम गोडसे हे नाटक मी केले असले तरी मला महात्मा गांधींबद्दल आदर आहे. तोच आदर मला बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांच्याबाबतही आहे. ही माणसे महान आहेत. त्यांच्यावर टीका करणारा मी कोण? या सर्वांनी अस्पृश्यता आणि आणि जातीव्यवस्थेविरोधात केलेले बंड किंवा उठाव लक्षात घेतला पाहिजे. आपण अजूनही जातीव्यवस्थेत आहोत. आपण सारे मनुष्यजातीचे आहोत. सर्व हिंदू जातीचे आहोत, ही वज्रमूठ तयार झाली पाहिजे.

ज्यावेळी लहानपणी आंबेडकर आपल्या कुटुंबियांसह फिरायला जात असतील आणि त्यांच्या कुटुंबियांची त्या काळच्या उच्चवर्णीयांनी अवहेलना होईल, अपमान होईल असे उद्गार काढले असतील, त्यांनी तेव्हा आपल्या पालकांना हे विचारून आपल्याला हे का शिव्या देतात? अपमान का करतात हे जाणून घेतल असेल. आपण या विरोधात बंड करू असे सांगितले असेल. त्याचबरोबर आपल्या पालकांसमवेत फिरायला गेल्यानंतर उच्चवर्णीय अस्पृश्यांना शिव्या देतात, अपमानित करतात वि. दा. सावरकरांच्याही हे लक्षात आल्यानंतर त्यांनीही एक माणूस दुसऱ्या माणसाचा अपमान करणारा कोण? असा सवाल आपल्या नातेवाईकांना केला. म्हणूनच स्वकीयांच्या विरोधात बंडाची भूमिका घेणारे सावरकरही मोठे होते. हे अस्पृश्यता निवारणाचे कार्य करणाऱ्या आंबेडकर फुले यांच्याप्रमाणे सावरकर श्रेष्ठ असल्याचेही आपले आजही ठाम मत आहे, असे शरद पोंक्षे यांनी स्पष्ट केले.

Leave a Comment