राष्ट्रपतींनी फेटाळली पवन गुप्ताची दया याचिका


नवी दिल्ली – राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे दिल्लीत २०१२मध्ये घडलेल्या निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील दोषी पवन गुप्ताने दया याचिका केली होती. राष्टपतींनी ही याचिका फेटाळून लावली असली तरी याचिकेमुळे आरोपींची फाशी तिसऱ्यांदा लांबणीवर पडली आहे. आता लवकरच नवीन डेथ वॉरंट जारी करण्यात येणार असल्याचे वृत्त आहे.

यापूर्वीच्या निर्भया हत्या प्रकरणातील आदेशानुसार, मंगळवारी (३ मार्च) सकाळी ६ वाजता चारही दोषींना फाशी दिली जाणार होती. आतापर्यंत तिसऱ्यांदा या चौघांच्या फाशीची अंमलबजावणी पुढे ढकलली गेली आहे. त्यात राष्ट्रपतींकडे दोषी पवन गुप्ता याने दया याचिका केल्यामुळे फाशीची अंमलबजावणी राष्ट्रपती निर्णय देईपर्यंत होऊ शकत नसल्याचा निर्णय अतिरिक्त सत्र न्यायाधीश धर्मेद्र राणा यांनी दिला होता.

राष्ट्रपतींनी निर्णय देईपर्यंत पवन गुप्ताने दया याचिका केल्यामुळे सर्व दोषींविरुद्धच्या ‘डेथ वॉरंट’ची अंमलबजावणी लांबणीवर टाकण्यात येत असल्याचा निर्णय न्यायालयाने दिला होता. सोमवारी राष्ट्रपतींकडे पवन गुप्ताने दयेचा अर्ज केला होता. त्याने तशी माहिती न्यायालयाला दिली होती. त्याचबरोबर फाशीच्या अंमलबजावणीला स्थगिती द्यावी, अशी मागणीही केली होती. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी बुधवारी दुपारी पवन गुप्ताच्या दया याचिकेवर निर्णय दिला. दया याचिका राष्ट्रपतींनी फेटाळली असून, आरोपींच्या फाशीचा मार्ग मोकळा झाला आहे.

Leave a Comment