भारतीय फलंदाजांची दुसऱ्या डावातही फलंदाजांची सपशेल शरणागती


नवी दिल्ली – न्यूझीलंड विरुद्ध सुरु असलेल्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यात पहिल्या डावात मोठी आघाडी घेण्याची संधी भारतीय संघाने गमावली. 242 धावांत भारताचा पहिला डाव गुंडाळणाऱ्या न्यूझीलंडची अवस्थाही बिकट झाली होती. 133 धावांवर न्यूझीलंडचे 5 फलंदाज माघारी परतले होते, पण भारतीय गोलंदाजांना पुन्हा एकदा कायले जेमिसन, कॉलीन डी ग्रँडहोम आणि नील वॅगनर या तळाच्या फलंदाजांनी दमवले. पहिल्या डावात न्यूझीलंडने 235 धावा करताना टीम इंडियाला केवळ 7 धावांच्या आघाडीवर समाधान मानण्यास भाग पाडले. टीम इंडियाच्या फलंदाजांची दुसऱ्या डावातही हाराकिरी कायम राहिली. भारताने दुसऱ्या दिवसअखेर 97 धावांची आघाडी घेतली, पण निम्मा भारतीय संघ माघारी परतला आहे.

पहिल्या दिवसअखेर न्यूझीलंडने बिनबाद 63 धावांपर्यंत मजल मारली होती. पण, मोहम्मद शमी, उमेश यादव आणि जसप्रीत बुमराह यांनी दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात न्यूझीलंडला धक्के दिले. उमेश यादवने टॉम ब्लंडलला ( 30) माघारी पाठवून टीम इंडियाला पहिले यश मिळवून दिल्यानंतर जसप्रीत बुमराहने कर्णधार केन विलियम्सनला ( 3) स्वस्तात माघारी धाडले. रॉस टेलर ( 15), हेन्री निकोल्स ( 14) यांनी मोठी खेळी साकारता आली नाही. टॉम लॅथमने 52 धावा केल्या, पण त्याला शमीने माघाडी धाडले. 133 धावांवर न्यूझीलंडचा निम्मा संघ माघारी परतल्यानंतर टीम इंडियाला सामन्यात मजबूत पकड घेण्याची संधी होती.

पण, भारतीय गोलंदाजांची कॉलीन डी ग्रँडहोम ( 26), नील वॅगनर ( 21) आणि कायले जेमिसन यांनी धुलाई केली. वॅगनर आणि जेमिसन यांनी अर्धशतकी भागीदारी केली. जेमिसनने 63 चेंडूंत 49 धावा केल्या. न्यूझीलंडचा पहिला डाव 235 धावांत गुंडाळण्यात टीम इंडियाला यश आले, पण त्यांना 7 धावांच्या आघाडीवरच समाधान मानावे लागले. भारतातर्फे मोहम्मद शमीने सर्वाधिक 4 गडी बाद केले, तर जसप्रीत बुमराहने 3, रवींद्र जडेजाने 2 गडी बाद केले.

भारतीय संघाच्या दुसऱ्या डावात मयांक अग्रवाल पुन्हा एकदा अपयशी ठरला. त्याला ट्रेंट बोल्टने 3 धावांवर माघारी पाठवले. त्यानंतर टीम साऊदीच्या गोलंदाजीवर पृथ्वी शॉ (14) माघारी परतला. टीम इंडियाचा कर्णधार विराटला ( 14) कॉलीन डी ग्रँडहोमने पायचीत केल्यानंतर अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा यांनी संयमी खेळ दाखवला. पण, रहाणे ( 9) आणि पुजारा (24) हे दोघेही माघारी परतले. दिवसअखेर टीम इंडियाने 6 बाद 90 धावा करताना 97 धावांनी आघाडी वाढवली आहे.

Leave a Comment