IND vs NZ : पहिल्या दिवसाखेर भारताच्या 5 बाद 122 धावा

भारत आणि न्युझीलंड यांच्यामध्ये सुरू असलेल्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामन्यात न्युझीलंडच्या संघाने भारताला प्रथम फलंदाजी करण्याचे आमंत्रण दिले. मात्र पहिल्या दिवशी भारतीय संघ चांगली कामगिरी करण्यास अपयशी ठरला. भारताने पहिल्या दिवशी 55 ओव्हरमध्ये 5 विकेट गमावत 122 धावांपर्यंत मजली मारली. पावसाच्या व्यत्ययामुळे चहापानानंतरचे अखेरचे सेशन वाया गेले.

पहिल्या दिवसाखेर अंजिक्य रहाणे 38 धावा आणि ऋषभ पंत 10 धावांवर नाबाद होते.

भारताच्या डावाची सुरूवात करण्यास मैदानात उतरलेली पृथ्वी शॉ आणि मयांक अग्रवाल ही जोडी मोठी भागीदारी करण्यास अपयशी ठरली. पृथ्वी शॉ चौथ्याच ओव्हरला 16 धावा करून टिम साऊदीच्या गोलंदाजीवर बोल्ड झाला. त्यानंतर आलेला चेतेश्वरा पुजारा देखील 11 धावांवर जॅमीसनच्या गोलंदाजीवर बाद झाला.  मयांक अग्रवाल 34 धावांवर बोल्टच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला.

जॅमीसननेच कर्णधार विराट कोहली (2) आणि हनुमान विहारीला (7) बाद करत भारताची अवस्था 101 धावांवर 5 बाद अशी केली.  यानंतर आलेल्या ऋषभ पंत आणि अजिंक्य रहाणने सावध फलंदाजी करत पडझड थांबवली.

न्यूझीलंडकडून कायले जॅमीसनने सर्वाधिक 3 तर साऊदी आणि बोल्टने प्रत्येक 1 विकेट घेतली.

Leave a Comment