केंद्राकडे सोपवलेला नाही भीमा-कोरेगाव हिंसाचाराचा तपास – उद्धव ठाकरे


सिंधूदुर्ग – भीमा कोरेगाव आणि एल्गार परिषद ही दोन्ही वेगवेगळी प्रकरणे असून त्यातील भीमा-कोरेगाव हा दलित बांधवांशी संबंधित विषय आहे. केंद्राकडे या प्रकरणाचा तपास सोपवलेला नाही आणि तो यापुढे सुद्धा देणार नाही असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. ते सिंधुदुर्ग येथे बोलताना पुढे म्हणाले, की एल्गार परिषदेचा विषय पूर्णपणे वेगळा आहे. एल्गारचा तपास केंद्रानेच काढून घेतला आहे. तरीही भीमा-कोरेगाव हा विषय वेगळाच आहे. विशेष म्हणजे एसआयटी तपासाची मागणी करणारे एक पत्र राष्ट्रवादी काँग्रेसने मुख्यमंत्र्यांना दिले होते. पण हा तपास एनआयमार्फत करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिले. त्यावरूनच राजकीय वादंग निर्माण झाले आहे. ठाकरेंनी हे स्पष्टीकरण याच प्रकरणी बोलताना दिले आहे.

एवढे लक्षात घ्या की एल्गार आणि भीमा कोरेगाव हे दोन वेगवेगळे विषय आहेत. जो माझ्या दलित बांधवाचा विषय आहे, तो भीमा कोरेगावबाबतचा आहे आणि मी भीमा कोरेगावचा तपास केंद्राकडे दिलेला नाही, तसेच केंद्राकडे तो देणारही नाही. भीमा कोरेगावमध्ये दलित बांधवांवर अन्याय झाल्याचा आक्षेप आहे, त्याच्यात मी स्पष्टपणे सांगू इच्छितो की मी दलितांवर अन्याय होऊ देणार नसल्यामुळे एल्गार हा विषय वेगळा आहे आणि दलितांशी संबंधित भीमा कोरेगाव हा विषय वेगळा आहे. जो तपास केंद्र सरकारने आपल्याकडून काढून घेतला आहे, तो एल्गार परिषदेचा आहे, भीमा कोरेगावचा नसल्यामुळे कृपा करुन कोणीही गैरसमज करुन घेऊ नका. मी पुन्हा सांगतो, एल्गार हा विषय वेगळा आहे आणि दलितांशी संबंधित भीमा कोरेगाव हा विषय वेगळा आहे.

Leave a Comment