गुगल बंद करणार रेल्वे स्टेशनवरील मोफत वायफाय सेवा


नवी दिल्ली – गुगलने नुकतीच भारतातील रेल्वे स्टेशनवर देण्यात येणारी मोफत वायफायची सुविधा बंद करणार असल्याची घोषणा केली आहे. देशामधील ४०० हून अधिक स्टेशनवरून ही सेवा हळूहळू बंद करण्यात येणार आहे. मोफत वायफाय बंद होत असताना इंडियन रेल्वे आणि रेलटेल कॉर्पोरेशनबरोबर काम सुरू ठेवणार असल्याचे गुगलने म्हटले आहे. २०१५ मध्ये प्रथम रेल्वे स्टेशनवर मोफत वायफायची सुविधा गुगलने सुरू केली होती.

‘पेमेंट्स आणि नेक्स बिलियन युझर्स’चे उपाध्यक्ष केसर सेनगुप्ता यांनी देशातील हजारो ठिकाणी दूरसंचार कंपनी आणि स्थानिक संस्थांच्या मदतीने मोफत वायफाय देण्यात आल्याचे सांगितले. ते म्हणाले, रेल्वे स्टेशनवर मोफत वायफायची सुविधा सुरू करण्याची मागणी दुसऱ्या देशातील भागीदारांनी केली. आम्ही त्याप्रमाणे सुरुवात केली. या भागीदारीबद्दल विशेषत: भारतीय रेल्वे आणि भारत सरकारबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत. आम्हाला त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून लाखो वापरकर्त्यांची सेवा करता आली आहे.

गुगलच्या दाव्यानुसार वायफाय बंद करण्याचा कंपनीने मोबाईल डाटाचे प्लॅन परवडणाऱ्या दरात राहण्यासाठी निर्णय घेतला आहे. तसेच जगभरासह भारतात मोबाईलची कनेक्टिव्हिटी वाढविण्यासाठी सेवा बंद करण्यात आली आहे. प्रति जीबी सर्वात स्वस्त मोबाईल डाटा मिळणाऱ्या देशापैकी भारत आहे. ट्रायच्या आकडेवारीनुसार गेल्या पाच वर्षात मोबाईल डाटाचे दर ९५ टक्क्यांनी कमी झाल्याचे सेनगुप्तांनी म्हटले आहे. भारतीय हे दर महिन्याला १० जीबी डाटाचा वापर करतात, असे एका अहवालामध्ये म्हटले होते.

Leave a Comment