फडणवीसांनी ललकारले, हिंमत असेल तर पुन्हा निवडणूक घ्या


नवी मुंबई – शनिवारी जळगावमध्ये बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीका केली होती. त्यांनी भाजपला हिंमत असेल तर आमचे सरकार पाडून दाखवा, असे आव्हान दिले होते. माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नवी मुंबई येथे भाजपच्या राज्यस्तरीय अधिवेशनाच्या समारोपाच्या भाषणात प्रत्युत्तर दिले आहे. सरकार पाडण्यासाठी आम्ही हापापलेलो नाही. जर तुमच्यात हिंमत असेल तर पुन्हा निवडणुकीला सामोरे जाऊन दाखवा. हिंमत असेल तर चला जनतेच्या न्यायालयात, तुम्ही तीन पक्ष एकत्र आहात आणि आम्ही एकटे आहोत. बघुया कोण विजयी होते, असे प्रतिआव्हान त्यांनी दिले.

देशातील विविध पक्ष अराजकता माजवण्यासाठी, सत्तेसाठी समाजा-समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे काम करत आहेत. ज्येष्ठ नेते शरद पवार ‘सीएए’विषयी लोकांना चुकीचे मार्गदर्शन करत आहेत. भटक्या-विमुक्तांवर सीएएमुळे अन्याय होणार असल्याचे ते सांगत आहेत. सीएएमुळे त्यांना काय होणार आहे, हे चांगले माहीत असताना ते लोकांची दिशाभूल करत आहेत. हे खोटे बोलणे त्यांनी बंद करावे, असे फडणवीस म्हणाले.

विरोधकांना आम्ही आव्हान देतो, सीएएमुळे देशातील कोणत्या भटक्या विमुक्त, आदिवासी यांना कोणता धोका आहे, हे त्यांनी सांगावे नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांनी माफी मागावी, असे आव्हान त्यांनी दिले. देशात भटके विमुक्त, आदिवासी, मागास यांच्याशिवाय देश होऊ शकत नसल्यामुळेच मोदी यांनी आरक्षण संपल्याबरोबर त्याची मुदत वाढवून दिली. परंतु, सोशल मीडियाच्या माध्यमातून खोटे बोलले जात आहे, भागवत यांच्या नावाने नवे संविधान टाकले गेले, त्यामुळे देशात आता ही एक ठराविक दृष्टीकोन ठेऊन त्यासाठीची लढाई सुरू झाली आहे.

फडणवीस मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका करताना म्हणाले, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या जीवावर मुख्यमंत्री होण्याचे आश्वासन तुम्ही माननीय बाळासाहेब ठाकरेंना दिले होते का? जर त्यांना तसे आश्वासन दिले असते, तर तुम्हाला त्यांनी कधीही माफ कले नसते. शिवसेना औरंगाबादमध्ये कोणते तोंड घेऊन आघाडी करते, हे आम्हाला पाहायचे आहे. भाजप औरंगाबादमध्ये आपला महापौर बसवल्याशिवाय राहणार नाही. नवी मुंबई आणि औरंगाबाद या दोन महापालिकांमध्ये भाजपचा महापौर होईल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.

भीमा-कोरेगावच्या प्रकरणानंतर अर्बन माओवादाचा विषय समोर आला. त्याचे पूर्ण पुरावे दिले गेले आहेत. गृहमंत्र्यांनी शरद पवारांच्या दबावाखाली सांगितले की, एएनआयला तपास देणार नाही. पण, मुख्यमंत्र्यांचे त्याबाबतीत अभिनंदन करतो की, त्यांनी गृहमंत्र्यांचे ऐकले नाही.

या प्रकरणाला वेगळे वळण देण्याचा पवारांचा प्रयत्न आहे. शरद पवार समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. सत्य बाहेर येण्यापासून रोखण्यासाठी त्यांची एसआयटीची मागणी होती. पवारांचा माओवादाला पाठीशी घालण्याचा प्रयत्न आहे. पण सत्य बाहेर आल्याशिवाय राहणार नसल्याचे फडणवीस म्हणाले.

सेना-भाजप युतीला राज्यात जनादेश मिळाला होता, परंतु आपल्या स्वार्थासाठी या जनादेशाचा उद्धव ठाकरे यांनी विश्वासघात केल्यामुळे शिवसेना आज अधर्माच्या बाजूने उभी असल्याने त्यांच्या विरोधात लढावेच लागेल. आम्ही धुळ्यात जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत सेनेला आणि त्यांच्यासोबत आलेल्या काँग्रेस राष्ट्रवादीवर मात केली, तसेच आम्ही राज्यात येणाऱ्या निवडणुकांवर मात करू, नवी मुंबईत गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली भाजपचा झेंडा फडकवू आणि औरंगाबाद महापालिकेवरही भाजपची सत्ता आणू असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.

देशात अशांतता निर्माण केली जात असल्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांना येत्या काळात संपूर्ण ताकदीने उतरावे लागेल. कार्यकर्त्यांचे आता ऐकून घेण्याचे नाही, तर आता सूनवण्याचे दिवस आले आहेत. आता आपल्याला लढाई जिंकायची आहे, अनेकवेळा विरोधीपक्ष म्हणून जीवन गेलेले आहे, आपला डीएनए आहे, पण विरोधी पक्षाची भूमिका बजावण्यासाठी अंग चोरून काम न करता रस्त्यावर भिडावे लागते, सरकारला भीडावे लागते. आम्ही तयार आहोत असे सांगत फडणवीस यांनी उपस्थितांना तुमची तयारी आहे का, थेट मुकाबला करण्याची? असा तीन वेळा सवाल केला, त्याला उपस्थितांनी होकार देत प्रतिसाद दिला. त्यानंतर फडणवीस यांनी पहिला मुकाबला आम्ही करू आणि सरकारला जेरीस आणल्या शिवाय सोडणार नाही, असा इशारा दिला.

Leave a Comment