विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी तिसऱ्यांदा दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. या निमित्ताने केजरीवाल यांच्या विषयी काही खास गोष्टी जाणून घेऊया.
अरविंद केजरीवाल यांचा जन्म 16 ऑगस्ट 1968 ला हरियाणाच्या सिवानी येथे झाला आहे. त्यांचे वडील गोविंद राम इंजिनिअर होते. गोविंद राम यांनी 3 मुले-मुली आहेत. केजरीवाल यांच्या आईचे नाव गीता देवी आहे.
केजरीवाल यांचे लहानपण सोनीपत, गाझियाबाद आणि हिसार येथे गेले. त्यांनी प्राथमिक शिक्षण मिशनरीज शाळेतून पुर्ण केले. त्यानंतर आयआयटी खडगपूरमधून मॅकेनिकल इंजिनिअरिंगमध्ये पदवी मिळवली. यानंतर ते टाटा स्टीलमध्ये नोकरी करू लागले. मात्र लवकरच त्यांनी सिव्हिल सर्व्हिसच्या तयारीसाठी नोकरी सोडली. 1993 मध्ये ते सिव्हिल परिक्षेत पास झाले व ते महसूल सेवेत दाखल झाले.
1993 मध्ये मसूरी येथे प्रशिक्षणावेळी त्यांची भेट आयआरएस अधिकारी सुनिता यांच्याशी झाली. प्रशिक्षणानंतर केजरीवाल यांची दिल्ली येथे नेमणूक झाली. त्यानंतर 1995 मध्ये त्यांनी सुनिता यांच्याशी लग्न केले.
पुस्तके वाचण्यापासून ते बुद्धीबळ घेळण्याची देखील केजरीवाल यांना आवड आहे. ते स्केचिंग देखील चांगले करतात.
केजरीवाल यांनी संयुक्त आयुक्त पदावर असताना भ्रष्टाचाराविरोधात अभियानच सुरू केले. 2000 मध्ये त्यांनी परिवर्तन नावाच्या एनजीओची स्थापना केली. माहितीच्या अधिकाराचा कायदा लागू करण्यात केजरीवाल यांची महत्त्वाची भूमिका होती.
आरटीआय कायद्यासाठी त्यांना 2006 मध्ये मॅग्सेस पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यानंतर त्यांनी नोकरी सोडली. समाजसेवक अण्णा हजारे यांच्यासोबत मिळून त्यांनी लोकपाल बिलासाठी आंदोलन सुरू केले. याचवेळी 2012 मध्ये त्यांनी आम आदमी पक्षाची स्थापना करत राजकारणात प्रवेश केला.
2013 मध्ये त्यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्री शिला दीक्षित यांच्याविरोधात निवडणूक लढवली व त्यांचा पराभव केला. त्या निवडणुकीत विजय मिळाल्यानंतर आपने काँग्रेससोबत मिळून सरकार स्थापन केले. मात्र ते सरकार 49 दिवसच टिकले. त्यानंतर 2015 मध्ये झालेल्या निवडणुकीत 70 पैकी 67 जागा मिळवत ते दुसऱ्यांदा दिल्लीचे मुख्यमंत्री झाले.
या वर्षी झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत पुन्हा विजय मिळवत त्यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे.