आता टाटा-अदानी करणार देशातील 150 खासगी ट्रेनचे सारथ्य


नवी दिल्ली – आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात देशात तेजस एक्स्प्रेसप्रमाणे 150 खासगी ट्रेन चालवण्याचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी जाहीर केले होते. त्यानुसार देशभरातून 100 मार्गांची निवड रेल्वेने केली आहे, ज्यामध्ये मुंबई -दिल्ली तसेच हावडा -दिल्लीसारख्या व्यस्त मार्गांचाही समावेश आहे. दरम्यान, देशी-विदेशी अनेक बड्या उद्योग समूहांनी या खासगी ट्रेन चालविण्यात रस दाखविला आहे.

मुंबई ते नवी दिल्ली, चेन्नई ते नवी दिल्ली, नवी दिल्ली ते हावड़ा, शालीमार ते पुणे, नवी दिल्ली ते पाटणा अशा काही मार्गांची खासगी ट्रेन चालवण्यासाठी निवड करण्यात आली आहे. अल्स्टॉम ट्रान्सपोर्ट, बॉम्बार्डियर, सीमेंस एजी, ह्युंदाई रोटेम कंपनी आणि मॅकक्वेरी यासह अनेक जागतिक दर्जाच्या कंपन्यांचा खासगी ट्रेन चालविण्यात रस दाखिणाऱ्यांमध्ये समावेश आहे. तर देशांतर्गत कंपन्यांमध्ये टाटा रियल्टी अँड इंफ्रास्ट्रक्चर, हिताची इंडिया आणि साउथ एशिया, एस्सेल ग्रुप, अदानी पोर्ट्स आणि सेझ (एसईझेड), भारतीय रेल्वे केटरिंग अ‍ॅड टुरिझम कॉर्पोरेशन यांचा समावेश आहे.

16 डब्यांच्या या प्रायव्हेट ट्रेन असतील आणि त्यांचा वेग दरताशी 160 कि.मी. एवढा असेल. या गाडय़ांच्या भाडेरचना आणि देखरेख करण्याची जबाबदारी प्रायव्हेट कंपन्यांवरच असणार आहे. एका अहवालानुसार 150 खासगी गाड्या देशातील 100 भारतीय रेल्वे मार्गावर चालविण्यासाठी सुमारे 22,500 कोटी रुपयांच्या गुंतवणूकीची आवश्यकता आहे. खासगी कंपन्यांना थोडा दिलासा देण्यासाठी खासगी ट्रेन सुटण्याच्या निर्धारित वेळेच्या 15 मिनिटांमध्ये इतर कोणतीही नियमित धावणारी रेल्वे सुटणार नाही, याची काळजी घेतली जाणार आहे. खासगी कंपन्या भाडे व थांबे निश्चित करण्यासाठी तथा भारतीय रेल्वेच्या मानकांनुसार कोणत्याही कंपनीकडून कोच व इंजिन खरेदी करण्यास स्वतंत्र असतील.

Leave a Comment