हिंगणघाट पीडितेला न्याय दिल्याशिवाय हे सरकार स्थिर बसणार नाही


मुंबई : हिंगणघाट जळीतकांडातील शिक्षक तरुणीच्या निधनानंतर राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान आरोपीला लवकरत लवकर शिक्षा होईल, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. त्याचबरोबर सर्वांनी संयम बाळगावा असे आवाहनही उद्धव ठाकरे यांनी केले आहे. कठोरातील कठोर कारवाई आरोपीवर करण्यात येईल. या खटल्याचा पाठपुरावा करुन, तो लवकरात लवकर निकाली काढू. खटला अनेकदा लांब चालतो. निकाल लागल्यानंतरही अंमलबजावणीसाठी वेळ लागतो. पण तसे मी होऊ देणार नाही, गुन्हा लवकरात लवकर सिद्ध करुन आरोपीला फासावर लटकवू, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

सर्वांनी धीर बाळगावा, याप्रकरणात जे आरोपी आहेत त्यांच्यावरचा गुन्हा लवकरात लवकर सिद्ध करून पीडितेच्या दोषीला शिक्षा दिल्याशिवाय हे सरकार स्थिर बसणार नाही. मी सर्वांच्या भावनेशी सहमत आहे. अशा घटनेला राज्यात थारा नाही आणि कोणतीही दया माया आरोपींना दाखवली जाणार नाही. या सर्वांचा पाठपुरावा करू. निकाल लागल्यावर अंमलबजावणीसाठी मी उशीर होऊ देणार नसल्याचे उद्धव ठाकरे यांनी नमूद केले आहे.

तसेच राज्यात हैदराबादसारखा कायदा न करता त्यात बदल करून कायदा कडक करण्यात येईल जेणेकरून अशा प्रकारचे कृत्य कोणी करणार नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. हिंगणघाटमध्ये जळीतकांडात जखमी झालेल्या तरुणीची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. पीडित तरुणीचा आज सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला.

दरम्यान या घटनेनंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही संताप व्यक्त केला आहे. आरोपीला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा लवकरच मिळेल पण, आपल्या घरात असा नराधम निर्माण होऊ न देणे हीच हिंगणघाट हल्ल्यातील मृत बहिणीला आपली आदरांजली असेल, असे अजित पवार म्हणाले. आपण हिंगणघाटमधील बहिणीला नराधमाच्या हल्ल्यापासून आणि नंतर मृत्यूपासून वाचवू शकलो नाही, महाराष्ट्राच्या मातीसाठी ही लाजीरवाणी घटना आहे. अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ न देण्यासाठी सरकार यापुढे अधिक संवेदनशील व गुन्हेगारांच्या विरोधात कठोरपणे काम करेल. महिलांच्या सन्मानाप्रती समाजानेही जागरूक राहिले पाहिजे. या घटनेतील आरोपीला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा लवकरच मिळेल आणि ती इतरांवर जरब बसवणारी असेल.

Leave a Comment