पुणेकराने बनवलेल्या प्लास्टिकच्या बंगल्याची देशभर होत आहे चर्चा


पुणे : जगभरासाठी प्लास्टिक एक वैश्विक समस्या बनली असून एका पुणेकर व्यक्तीने या समस्येलाच कल्पकतेची जोड देत एक बंगला बनवला आहे, ज्याची देशभरात चर्चा होत आहे. सिहगड परिसरात प्लास्टिकच्या तब्बल ६० हजारांपेक्षा जास्त बाटल्यांपासून वास्तूविशारद राजेंद्र इनामदार यांनी दोन मजली घर साकारले आहे.

जगभर प्लास्टिकच्या कचऱ्याची समस्या गंभीर रुप धारण करत आहे. कारण या प्लास्टिकचा अंत नाही. त्याचवेळी इतर उपाय शोधणे गरजेचे असल्यामुळेच इनामदार यांनी कल्पकतेला पर्यावरण भानाची जोड देत हजारो बाटल्यांचा पुनर्वापर करून घर बांधायचा निश्चय केला. त्यांनी जवळपास तीन वर्ष बाटल्या गोळा केल्या. त्यात क्रश, वाळू, सिमेंट भरले. तसे बघायला गेले तर हे वेळ खाऊ काम होते. पण इनामदार यांनी संयम बाळगत बाटल्यांच्याच टणक विटा बनवल्या. या बाटल्यामुळे घराच्या मजबुतीला बाधा पोहोचेल का असा प्रश्न अनेकांना पडतो. पण या बाटल्यांनी घर अत्यंत मजबूत बनते असे इनामदार सांगतात.

तसे बघायला गेले असे प्रयोग जगभरात झाले आहेत. पण असे प्रयोग भारतात फार झालेच नव्हते. इनामदार यांनी धाडस केले आणि घर प्लास्टिकचे बांधायचे ठरवले. पर्यावरणासाठी अत्यंत घातक ठरणाऱ्या प्लास्टिकच्या बाटल्यांपासून घर उभारल्याने कचऱ्याचा पुनर्वापर झाला. हा मार्ग प्रत्येकाने अवलंबला तर प्रदूषण होणार नाही, असे आवाहन इनामदार करतात.

बांधकामासाठी वापरली जाणारी बाटली भरण्यासाठी साडेतीन रूपये खर्च येतो. तर सुमारे सात रूपये एका वीटेची किंमत असल्यामुळे खर्च तर वाचतोच शिवाय पर्यावरणाचेही रक्षण होते. राज्यात प्लास्टिक बंदी लागू झाली असली तरी त्याच्या अंमलबजावणीचा प्रश्न आहेच. पण प्लास्टिकचा पुनर्रवापरही केला जात नसल्याने प्लास्टिकचा कचरा एक गंभीर समस्या बनली आहे.

अशा अनोख्या प्रयोगांची ही समस्या सोडवण्यासाठी गरज आहे. प्लास्टिकचा वापर करून सरकारकडूनही रस्ते निर्मितीचा प्रयोग काही ठिकाणी केला जात आहे. पण त्याचे प्रमाण अजूनही कमी आहे. सरकारी आणि खासगी प्रयत्नच आपल्याला प्लास्टिकमुक्तीकडे नेऊ शकतात. इनामदार याचे इमानदार प्रयत्न त्यादृष्टीने टाकलेले पाऊल मैलाचा दगड ठरु शकते.

Leave a Comment