हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंना भारतरत्न द्या – तोगडिया


नागपूर – राम मंदिर आंदोलनात बाळासाहेब ठाकरे, अशोक सिंघल, महंत रामचंद्र परमहंस, गोरख मठाचे महंत अवैधनाथ या नेत्यांचे योगदान मोठे असल्यामुळे भारत सरकारने या मोठ्या नेत्यांना भारतरत्न देऊन त्यांचा गौरव करावा, अशी मागणी आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे अध्यक्ष डॉ प्रवीण तोगडिया यांनी केली. नागपूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत तोगडिया बोलत होते.

जेव्हा राम मंदिर आंदोलनाचे नेतृत्व करायला कुणी तयार नव्हते तेव्हा या नेत्यांनी नेतृत्व केले. या व्यक्तींना भारत सरकारने भारतरत्न द्यावा, अशी मागणी तोगडिया यांनी केली. सोबतच राम मंदिर उभारणीत शेकडो राम भक्तांचे रक्त व हजारो राम भक्तांच्या घामाचे श्रेय असल्यामुळे सोमनाथ मंदिराच्या धर्तीवर अयोध्येतील राम मंदिर परिसरात बलिदान देणाऱ्या रामभक्ताचे स्मारक बनवण्याची मागणीही तोगडिया यांनी केली.

जेव्हा भाजप एकटा पक्ष होता, त्यावेळी केवळ शिवसेना त्यांच्यासोबत उभी होती. लहान भावाला मुख्यमंत्रीपद दिल्याने भाजप काही लहान झाला नसता, असेही प्रवीण तोगडिया यांनी भाजपला कानपिचक्या दिल्या. जे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर लढतात मग ते कुठल्याही पक्षाचे नेते असोत, त्यांना माझे समर्थन असल्याचे प्रवीण तोगडिया म्हणाले. हिंदुत्वाचे कार्य महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे करीत असल्याने माझे त्यांना समर्थन असल्याचे प्रवीण तोगडिया म्हणाले.

Leave a Comment