मुंबई : भाजपचे नेते आशीष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर शेलक्या भाषेत टीका केल्याने वाद निर्माण झाला आहे. रविवारी वसई येथे झालेल्या सभेत ही टीका त्यांनी केली. राज्यात CAA आणि NRC लागू होऊ देणार नसल्याचे उद्धव ठाकरेंनी एका मुलाखतीत म्हटले होते. शेलार यांनी त्यावर टीका करताना हे काय तुझ्या बापाचे राज्य आहे का? अशी टीका केली होती.
कायद्याचे राज्य राज्यात चालते आणि घटनेनुसार राज्य हे चालते त्यामुळे संसदेने मंजूर केलेला कायदा कसा लागू करणार नाही ते मुख्यमंत्र्यांनी सांगावे असेही शेलार यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर शेलार यांनी हा कायदा केंद्राचा असून कायदा लागू होऊ देणार नाही म्हणजे अरे तुझ्या बापाचे राज्य आहे का?, असा घणाघात केला आहे.
नालासोपाऱ्यात भाजपचे ज्येष्ठ नेते आणि वसई जनता सहकारी बँकेचे माजी संचालक सुरेश जोशी यांच्या स्मृत्तीदिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. भारतीय विद्यार्थी चळवळ दशा आणि दिशा या विषयावर बोलताना या कार्यक्रमात आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली.
उद्धव च्या बापाचे राज्य आहे का … असे जाहीर निवेदन करणे @ShelarAshish ह्यांना शोभत नाही ..
आणि होय
मराठी माती ला आई आणि मराठी माणसाला बाप मानण्याची आमची संस्कृती आहे …
आम्ही गुजरात मध्ये बापाचा शोध घेणाऱ्यातले नाही ….— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) February 3, 2020
राष्ट्रवादीचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी शेलार यांच्या या टीकेला जोरदार टीका करत अशी टीका करणे हे तुम्हाला शोभत नाही. आमची मराठी मातीला आई आणि मराठी माणसाला बाप मानण्याची संस्कृती आहे. गुजरातमध्ये बापाचा शोध घेणाऱ्यातले आम्ही नसल्याचेही त्यांनी म्हटले.