दिल्लीची सत्ता काबीज केल्यानंतर पाडून टाकू सरकारी जमिनीवरील मशिदी


नवी दिल्ली: भाजपला शाहीन बागेतील आंदोलन संपवण्यासाठी दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर तासभराचा अवधीही लागणार नाही, असे वादग्रस्त वक्तव्य भाजप खासदार परवेश वर्मा यांनी केले. सोमवारी ते एका कार्यक्रमात बोलत होते. पश्चिम दिल्ली लोकसभा मतदारसंघाचे परवेश वर्मा हे खासदार आहेत. त्यांनी यावेळी म्हटले की, दिल्लीत ११ फेब्रुवारीला भाजपने दिल्लीची सत्ता काबीज केल्यानंतर शाहीन बागेत तुम्हाला एकही व्यक्ती सापडणार नाही. त्याचबरोबर भाजपची सत्ता दिल्लीत आल्यावर एका महिन्यात मी माझ्या मतदारसंघातील सरकारी जागांवर उभारण्यात आलेल्या मशिदी पाडून टाकेन, असेही वर्मा यांनी म्हटले. जे वक्तव्य मी केले. ते माघार घेण्यासाठी नसल्याचेही वर्मा यांनी म्हटले आहे.

आम्ही शाहीन बागसोबत असल्याचे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया म्हणतात. परंतु, शाहीन बाग हे काश्मीर झाले असून काश्मीरमध्ये ज्याप्रमाणे काश्मीर पंडितांच्या बहिणी, मुलींवर अत्याचार झाले. तशी परिस्थिती दिल्लीत देखील उद्भवेल.सत्तेत भाजप आली नाही तर ते तुमच्या घरात घुसतील, तुमच्या मुली-बहिणींना उचलून नेतील, त्यांच्यावर बलात्कार करतील. त्यामुळे तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे. उद्या मोदी किंवा अमित शहा तुम्हाला वाचवायला येणार नाहीत, अशी भीतीही परवेश वर्मा यांनी व्यक्त केली.

काँग्रेस आणि ‘आम आदमी पक्ष’ (आप) परवेश वर्मा यांच्या या वक्तव्यावरून आक्रमक होण्याची शक्यता आहे. केंद्रीय अर्थराज्यमंत्री आणि भाजप नेते अनुराग ठाकूर रिठाला विधानसभा मतदारसंघातील सभेत एका वादग्रस्त घोषणेमुळे अडचणीत आले आहेत. अनुराग ठाकूर यांनी भाषणादरम्यान ‘देश के गद्दारो को’ असे उच्चारताच जमावाने ‘गोली मारो’ अशा घोषणा दिल्या. व्यासपीठावरील एका नेत्यानेही हीच घोषणा दिली. पण त्या नेत्याला अनुराग ठाकूर यांनी लगेच रोखले. पण, भाजपच्या नेत्यांना ठरवून जमावाकडून अशाप्रकारच्या घोषणा वदवून घेतल्याचा विरोधकांचा आरोप आहे.

Leave a Comment