चीनच्या या ठार वेड्या सम्राटाकडे होती तृतीयपंथीयांची फौज


चीन या देशाचा इतिहास देखील आपल्या भारताप्रमाणेच अतिशय खिळवून ठेवणारा असून विचित्र आणि विक्षिप्त गोष्टींनी चीनचा इतिहास हा भरलेला आहे. चीनच्या इतिहासाची खास गोष्ट म्हणजे जेवढे राजे या देशात झाले तेवढे राजे फारच कमी देशीत आपल्याला पाहायला मिळतील. या देशातील काही राजे शूर होते, तर काही प्रेमळ होते तर काही अगदीच वेडे आणि विक्षिप्त होते. चीनच्या इतिहासात असाच एक ठार वेडा सम्राट होता तो म्हणजे चीनचा सम्राट झेंगडे.

२६ ऑक्टोंबर १४९१ रोजी प्रसिद्ध मिंग साम्राज्यात सम्राट झेंगडे मूळ नाव ‘झु होझाओ’चा जन्म झाला. संपूर्ण चीन साम्राज्यावर त्याच्या वडिलांची सत्ता होती. त्यांनी स्वत:च्या पराक्रमाच्या जोरावर संपूर्ण चीन आपल्या कवेत घेतला होता. अश्या या शूर राज्याचा अकस्मात मृत्यू झाला आणि त्याचा मुलगा झु होझाओ वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी गादीवर बसला आणि चीनचा सम्राट झाला. काही लहानपणापासून झु हा विक्षिप्त नव्हता. सर्वच बाबतीत तो हुशार होता. तो धर्मशास्त्रामध्ये पारंगत होता. पण भल्याभल्या विद्वानांना सत्त्तेची धुंदी नादी लावते आणि त्यांची बुद्धी भ्रष्ट करते हे काही उगाचच म्हटले जात नाही. तसेच काहीसे झु सोबत देखील झाले.

तो मदिरा आणी मदिराक्षी यांच्या सहवासात स्वत:चे सम्राटपद विसरून गेला. त्याने आपल्या जनानखाण्यात एवढ्या वेश्या ठेवल्या होत्या की हळूहळू जागा अपुरी पडू लागली. प्रत्येकीकडे त्याला जातीने लक्ष देता येईना. त्यामुळे अनेक जणींची उपासमार व्हायची. काही जणींना त्यामुळे मृत्यूने गाठले. एकदा तर जनानखान्याला भलीमोठी आग लागली. अनेक स्त्रिया त्यात गुदमरून मृत पावल्या. सम्राज्ञीच्या आदेशावरून ही आग लावली गेल्याचे बोलले जाते. पण या गोष्टींची सम्राट झेंगडेला काहीही फिकीर नव्हती.

जनानखान्यातून क्वचितच सम्राट झेंगडे हा बाहेर यायचा. या जनानखान्यातच त्याचा दरबार भरला जायचा असे म्हटले तरी वावगे ठरू नये. तो तेथूनच प्रजेबद्दलचे आणि राज्याबद्दलचे महत्त्वपूर्ण निर्णय घ्यायचा. तो कधीही निर्णय घेण्यापूर्वी सल्लामसलत करण्याच्या भानगडीत पडायचा नाही. कोणताही प्रश्न सेकंदात सोडवायचा आणि त्यावर निर्णय देण्यात त्याचा हातखंडा होता. अर्थातच त्याला बहुतांश निर्णयाचा फटका बसला परंतु काही निर्णय मात्र त्याच्या चांगलेच पथ्थावर पडले.

राजा झेंगडेला त्याचप्रमाणे शिकारीचा देखील नाद होता. पण शिकार करण्यासाठी उठून जंगलात जाणे त्याला कंटाळवाणे वाटत असे. त्याने यावर शक्कल लढवून काही श्वापद राजमहालातच आणली आणि ज्यावेळी त्याची शिकारी करण्याची इच्छा होत असे तेव्हा त्या पिंजऱ्यातील श्वापदांना तो बाहेर काढत असे आणि मग त्यांचा जीव घेऊन शिकार केल्याचा आनंद घेत असे.

सम्राट झेंगडेच्या मनात कधी काय येईल हे सांगता येत नव्हते. हिजड्यांबद्दल अचानक या सम्राटाला कळवला वाटू लागला. त्याने चीनमधीलच नाही तर विदेशातील हिजड्यांना देखील आपल्या साम्राज्यात येण्याचे आमंत्रण पाठवले आणि एक फौज बनवून त्यांची त्यांना आपल्या सेवेत ठेवून घेतले. आठ हिजड्यांची त्याने निवड केली आणि त्यांची एक सल्लागार समिती स्थापन केली. ‘एट टायगर्स’ असे या आठ हिजड्यांना म्हटले जायचे. तो त्यांच्या प्रत्येक सल्ल्याचे पालन करायचा. त्यांना अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार देखील सम्राटाने बहाल केला होता. एट टायगर्सने या अधिकाराचा बराच गैरफायदा घेतला, ‘लिऊ जीन’या गटाचा प्रमुख होता. सम्राट झेंगडेच्या अतिशय मर्जीतला माणूस म्हणून सगळे त्यांना घाबरून असायचे. लिऊ जीन हा वाटायचा तितका साधा नव्हता. त्याने सम्राट झेंगडेची हत्या करून आपल्या भावाच्या नातवाला गादीवर बसवायचे आणि संपूर्ण राज्य आपल्या हाती घ्यायचे असा कट रचला. पण एट टायगर्स पैकी कोणा एकाला लिऊ जीनचे हे कट कारस्थान कळले आणि त्याने थेट सम्राट झेंगडेला या कटाबद्दल सांगितले.

सम्राट झेंगडेची तळपायाची आग हे ऐकून मस्तकात गेली. लिऊ जीनची त्याने चौकशी करण्याचे आदेश दिले. घाबरून लिऊ जीनने आपला गुन्हा कबूल केला. अर्थातच सम्राट झेंगडे हा काही मृदु मनाचा नव्हता, लिऊ जीनला त्याने मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली. लिऊ जीनला १५१० साली प्रजेसमोर ठार मारण्यात आले. सम्राट झेंगडे या घटनेनंतर तरी सुधारेल अशी दरबारातील काही एकनिष्ठ लोकांना आशा होती. पण सम्राट झेंगडेचे स्वभावात काहीही बदल झाला नाही. त्याने सभोवतालच्या राज्यांववर विनाकारण आक्रमणे केली. सम्राट झेंगडेच्या या स्वभावामुळे त्याच्याबद्दल इतर साम्राज्यांमध्ये असंतोष निर्माण झाला. प्रजा देखील सम्राटाच्या विक्षिप्त वागण्याला कंटाळली होती. अनागोंदीच्या या वातावरणाचा हिजड्यांच्या फौजांनी बराच फायदा घेतला. त्यांनी सम्राट झेंगडेचे साम्राज्य अगदी धुळीला मिळवून टाकले.

मिंग साम्राज्याचा अस्त होत होता आणि २० एप्रिल १५२१ रोजी राजा झेंगडे अचानक नाहीसा झाल्याचे निदर्शनास आले. त्याची सगळीकडे शोधाशोध सुरु झाली. तेव्हा महाला जवळ असलेल्या एका तलावात त्याचे मृत शरीर आढळले. कोणी सम्राट झेंगडेची हत्या केली याचे सत्य शेवटपर्यंत गुलदस्त्यातच राहिले. संपत्तीच्या लोभापायी त्याच्या विश्वासातील हिजड्यांनीच त्याचा काटा काढला अशी कुजबुज सुरु होती. पण ठोस असे काही निष्पन्न न होऊ शकल्यामुळे झेंगडेची हत्या नेमकी कुणी आणि का केली हे अद्यापपर्यंत कळू शकले नाही.

Leave a Comment