मराठमोळ्या तरुणाने तयार केल्या पाण्यात विरघळणाऱ्या प्लास्टिक पिशव्या


कधीही नष्ट होणारी गोष्ट म्हणजे प्लास्टिक. जगभरात दररोज कोट्यवधी टन प्लास्टिक जमा होते. या प्लास्टिकची विल्हेवाट लावणे अशक्य आहे. कारण प्लास्टिक अविघटनशील पदार्थ असून प्लास्टिकच्या पिशव्यांशिवाय दररोजच्या वापरात काही चालत नाही. भारतीय वंशाच्या एका उद्योजकाने यावर उपाय म्हणून चक्क पाण्यात विरघळणारे इको फ्रेंडली प्लास्टिक बनवले आहे. विशेष म्हणजे जनावरांनी जरी हे प्लास्टिक खाल्ले तरी त्यांना याचा अपाय होणार नाही.

मुळचा मंगलोरचा पण सध्या कतारमध्ये अश्वथ हेगडे हा उद्योजक राहतो. बायोडिग्रेबल अशा प्लास्टिकच्या पिशव्या त्याच्या ‘एन्वीग्रीन’ या कंपनीने बनवल्या आहेत. त्यांनी या पिशव्या स्टार्च आणि वनस्पतीचे तेल वापरून तयार केल्या आहेत. ‘द बेटर इंडिया’ या वेबसाईटला दिलेल्या माहितीनुसार हेगडे यांच्या कंपनीने बटाटे, मका, स्टार्च, केळी आणि फुलांचे आणि वनस्पतीचे तेल वापरून या पिशव्या बनवल्या आहे. लवकरच भारतात या पिशव्या विक्रीसाठी आणण्याचा त्यांचा मानस आहे. या पिशव्या भारतात विक्रीसाठी यावर्षांच्या अखेरपर्यंत आणण्यासाठी ते प्रयत्न करत आहे. त्या पिशव्या बाजारात ३ रुपयांच्या आसपास उपलब्ध होतील असेही त्यांनी सांगितले.

२४ तासांतच पाण्यात विरघळतील किंवा गरम पाण्यात काही सेंकदात या पिशव्या विरघळतील असा दावा हेगडे यांनी केला आहे. जनावरांच्या पोटात जरी या पिशव्या गेल्या तरी त्यांना अपाय होणार नाही असेही हेगडेंनी सांगितले आहे. प्लास्टिक ही गंभीर समस्या बनत चालली असून पर्यावरणाला त्यामुळे खूप हानी पोहचत आहे. एका संशोधनानुसार गेल्या पंन्नास वर्षांत प्लास्टिकचा वापर ५० लाख टनांवरून १० कोटी टन इतका पोहचला आहे. भारतात दरदिवशी १५ हजार टन प्लास्टिक कचरा तयार होतो. त्याची विल्हेवाट लावणे ही सगळ्यात मोठी समस्या बनल्यामुळे, हेगडे यांना भारत प्लास्टिकमुक्त बनवायचा आहे.

Leave a Comment