ईएसआयसीने केला नोव्हेंबरमध्ये १४ लाख ३३ हजार नव्या रोजगार निर्मितीचा दावा


नवी दिल्ली – नुकत्याच समोर आलेल्या आकडेवारीतून देशात रोजगार निर्मिती वाढ झाल्याचे दिसून आले आहे. १४.३३ लाख नव्या नोकऱ्यांची निर्मिती नोव्हेंबर २०१९ मध्ये झाली आहे. तर १२.६० लाख नव्या नोकऱ्यांची नोव्हेंबर २०१८ मध्ये निर्मिती झाली होती. राज्य विमा महामंडळाने (ईएसआयसी) ही आकडेवारी दिली आहे.

१ लाख ४९ हजार जणांनी आर्थिक वर्ष २०१८-१९ मध्ये ईएसआयसीसाठी नव्याने नोंदणी केली आहे. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने (एनएसओ) ही माहिती अहवालात दिली आहे. तर सप्टेंबर २०१७ ते नोव्हेंबर २०१९ दरम्यान सुमारे ३.३७ कोटी जणांनी नव्याने ईएसआयसीसाठी नव्याने नोंदणी केली आहे.

विविध सामाजिक सुरक्षा योजनेतून एनएसओची आकडेवारी ही घेण्यात आली आहे. ईएसआयसी, निवृत्तीवेतन निधीची संस्था ईपीएफओ, निवृत्तीवेतन निधी नियामक आणि विकास प्राधिकरण (पीएफआरडीए) या योजनांचा त्यामध्ये समावेश आहे. नव्याने नोंदणी करणाऱ्यांची आकडेवारी या तिन्ही संस्था एप्रिल २०१८ पासून जाहीर करत आहेत. यामध्ये सप्टेंबर २०१७ पासूनच्या आकडेवारीचा समावेश आहे.

ईएसआयसीच्या आकडेवारीनुसार सप्टेंबर २०१७ ते मार्च २०१८ दरम्यान नव्याने ८३.३५ लाख जणांनी नोंदणी केली आहे. तर कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थेच्या (ईपीएफओ) आकडेवारीनुसार नोव्हेंबर २०१९ मध्ये ११.६२ जणांनी नव्याने नोंदणी केली आहे. तर ऑक्टोबर २०१९ मध्ये ६.४७ लाख जणांनी नव्याने नोंदणी केली होती. अहवालात रोजगाराच्या भिन्न पातळीवरच्या आकडेवारी असल्याचे एनएसओने म्हटले आहे.

Leave a Comment