निर्भयाच्या दोषींवर दररोज ५० हजार रुपयांचा खर्च


नवी दिल्ली : सध्या तिहार जेलमध्ये निर्भयाचे चारही दोषी कैद असून, जवळपास ५० हजार रुपये त्यांच्या सुरक्षेवर दररोज खर्च करण्यात येत आहेत. त्यांना फासावर लटकावण्यासाठी दिल्ली न्यायालयाने डेथ वॉरंट जारी केला, त्या दिवसापासून दररोज हजारो रुपये त्यांच्या सुरक्षेसाठी खर्च केले जात आहेत. हा खर्च कोठडीच्या बाहेर तैनात केलेले ३२ सुरक्षा रक्षक आणि फाशीच्या तयारीसाठी करण्यात येणारी कामे यांच्यावर केला जात आहे. सुरक्षा रक्षकांना विश्रांती मिळावी यासाठी दर दोन तासाला ड्युटी बदलली जात आहे.

याबाबत तुरुंगातील सूत्रांच्या माहितीनुसार, तिहारमधील जेल क्रमांक ३ मध्ये वेगवेगळ्या कोठड्यांमध्ये चौघांनाही ठेवण्यात आले आहे. दोन सुरक्षा रक्षक प्रत्येकाच्या कोठडीबाहेर तैनात करण्यात आले आहेत. त्यातील एक हिंदी आणि इंग्रजी भाषेचे ज्ञान असलेला तामिळनाडू विशेष पोलीस दलातील कर्मचारी आणि एक तिहार तुरुंग प्रशासनातील अधिकारी आहे.

दर दोन तासाला दोषींच्या कोठडीबाहेर तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकांची ड्युटी बदलली जाते. त्यांना आराम दिला जातो. प्रत्येक कैद्यासाठी २४ तासांसाठी आठ-आठ सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत. म्हणजेच चार कैद्यांसाठी एकूण ३२ सुरक्षा रक्षक तैनात आहेत. २४ तासांत ते ४८ शिफ्टमध्ये काम करत आहेत.

त्यांना डेथ वॉरंट जारी होण्याआधी अन्य कैद्यांसोबत ठेवले जात होते. स्वतंत्र कोठडी त्यांच्यासाठी नव्हती. पण, डेथ वॉरंट जारी झाल्यानंतर त्यांनी आत्महत्या करू नये किंवा तुरुंगातून पळून जाऊ नये म्हणून दर दोन तासांच्या शिफ्टमध्ये दोन सुरक्षा रक्षक आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे त्यांच्यावर लक्ष ठेवले जात आहे.

Leave a Comment