आता कुठे गेल्या त्या संघटना ज्या शिवसेनेच्या विरोधात बोलत होत्या


मुंबई – ‘पॉलिटिकल कीडा’ या ट्विटर हँडलवरून दिल्लीतील विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर तान्हाजी या चित्रपटातील दृष्यांना मॉर्फिंग करून शिवाजी महाराजांच्या चेहऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नरवीर तान्हाजी मालुसरे यांच्या चेहऱ्यावर अमित शहांचा चेहरा लावण्यात आला आहे. या प्रकारामुळे पुन्हा एका नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. आपल्या पत्रकार परिषदेत बोलताना संजय राऊत यांनीही आता कुठे गेल्या त्या संघटना ज्या शिवसेनेच्या विरोधात गरळ ओकत होत्या? असा प्रश्न उपस्थित केला आहे.

आपल्या पत्रकार परिषदेत बोलताना खासदार संजय राऊत यांनी या अगोदर झालेल्या वादातील काही प्रमुख लोकांचा अप्रत्यक्ष उल्लेख करत त्यांना टोला लगावला आहे. आपल्या राज्यात काही प्रमुख लोक आहेत. फक्त त्यांनाच ज्यांना छत्रपती शिवाजी महाराजांबाबत बोलण्याचा अधिकार असल्याचे वाटते. आता या विषयावर अशा प्रमुख लोकांनी बोलले पाहिजे. याबाबत प्रश्न त्यांनाच विचारला पाहिजे, असा टोला राऊत यांनी उदयनराजे भोसले यांचे नाव न घेता लगावला आहे.

राजकीय स्वार्थासाठी छत्रपती शिवाजी महाराज आणि सुभेदार तान्हाजी यांचा वापर केला गेला आहे. राजकीय फोटो त्यांच्या चेहऱ्यावर लावून ते प्रचारात वापरले जात आहे. महाराष्ट्रात काही लोकांनी चार दिवसांपूर्वी हंगामा केला होता. आपण तो व्हिडीओ त्यांनाही पाठवला आहे. आता त्यांच्या प्रतिक्रियांची वाट पाहत असल्याचे राऊत यावेळी म्हणाले. काही लोकांनी सातारा तर काही लोकांनी सांगली बंद केले होते. तसेच काही लोकांनी मोठमोठी वक्तव्ये केली होती. त्यांनीही यावर बोलावे, असे राऊत म्हणाले.

छत्रपती शिवाजी महाराज विश्वाचे युगपुरुष असून ते आमचे दैवत आहेत. आमचा जीव जाईल पण आम्ही छत्रपतींचा अपमान कधी केला नाही. पण जर त्यांचा इतर कोणी अपमान करत असेल आणि विनाकारण आम्हालाच प्रश्न विचारत असतील तर, हंगामा करणार ‘ते’ गप्प का?’ असा सवाल राऊत यांनी केला.

Leave a Comment