अखेर त्या मुलाच्या भावनिक निबंधाची धनंजय मुंडेंनी घेतली दखल


बीड – आष्टी तालुक्यातील वाळके वस्तीवरील चौथीच्या विद्यार्थ्याने आपल्या वडिलांचे छत्र हरवलेल्या आपल्या कुटुंबाची व्यथा शिक्षकांनी सांगितलेल्या निबंधातून मांडली होती. यासंदर्भातील पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. अखेर बीडचे पालकमंत्री तथा राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी त्या पत्राची दखल घेतली आहे. त्या संघर्षपुत्र मंगेशला सामाजिक न्याय विभागाच्या वतीने मदत करण्यात येणार असल्याचे मंत्री धनंजय मुंडे यांनी जाहीर केले आहे.

काही दिवसांपूर्वी टीबीच्या आजाराने माझ्या वडीलांचे निधन झाले. पाण्यात बुडत असलेली गाय मी कशीबशी बाहेर काढली. कोणीही आम्हाला मदत करत नाही. मला आणि आईला चोरांची भीती वाटते. पप्पा मला तुमची खूप आठवण येते, अशा अत्यंत भावनिक शब्दात मंगेशने आपल्या व्यथा शाळेतील निबंधाच्या वहीत मांडल्या होत्या. काही दिवसांपूर्वी मंगेशच्या वडिलांचे निधन झाले. त्याच्या आई शारदा वाळके ह्या दिव्यांग आहेत. परिवारात कोणीही कमावते नसल्याने माय-लेकरांची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. मंगेशच्या दाटलेल्या भावना पाहून त्याच्या शिक्षिकेने तो निबंध इतरांना पाठवून मदतीचे आवाहन केले होते. त्यानंतर हा निबंध सोशल मीडियावर व्हायरल झाला. विविध माध्यमांमध्ये याची गेल्या दोन दिवसात जोरदार चर्चा सुरू होती.

ही बाब राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ समाजकल्याण विभागामार्फत ‘दिव्यांग बीज भांडवल योजनें’तर्गत 1.5 लाख रुपये स्वयंरोजगारासाठी अर्थ सहाय्य, जिल्हा परिषदेच्या दिव्यांग कल्याण निधीतून शेष 5 टक्के, बस पास, यु. डी. आय.डी. कार्ड, तसेच दिव्यांग महामंडळामार्फत रोजगारासाठी अर्थसहाय्य आदी योजना लागू करावी. तसेच वाळके परिवारास भरीव आर्थिक मदत करण्याचे निर्देश संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. मंगेश आणि त्याच्या परिवाराला सहाय्य मिळेल हे आता निश्चित झाले आहे.

Leave a Comment