साईबाबांचे जन्मस्थळ वादावर अखेर पडदा


मुंबई: अखेर सामोपचाराने साईबाबांच्या जन्मस्थळाच्या वादावर पडदा पडला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाथरीचा विकास साईबाबांचे जन्मस्थळ म्हणून नव्हे तर तीर्थक्षेत्र म्हणून करण्याचे आश्वासन दिले व पाथरी व शिर्डीकरांनी त्याला सहमती दिल्याने या वादाला आता पूर्णविराम मिळाला आहे.

साईबाबांचे जन्मस्थळ म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाथरीचा उल्लेख करून पाथरीसाठी विकास योजना जाहीर केली होती. त्यामुळे वादाला तोंड फुटले होते. साईबाबांचे जन्मस्थळ पाथरी नव्हे तर शिर्डी हेच असल्याचे सांगत शिर्डीकरांनी बेमुदत शिर्डी बंद पुकारला होता. मुख्यमंत्र्यांनी याप्रश्नी चर्चेअंती तोडगा काढण्याचे आश्वासन दिले होते. त्याचवेळी मुख्यमंत्र्यांनी बंद मागे घेण्याची विनंतीही केली होती. शिर्डीकरांनी या विनंतीला मान देत रविवारी रात्री बंद मागे घेतला होता. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी या प्रश्नावर आज मंत्रालयात तातडीने बैठक घेतली व वादावर यशस्वी तोडगा काढला.

आजच्या बैठकीत शिर्डी व पाथरीकरांनी सामोपचाराची भूमिका घेतली. साईबाबांचे जन्मस्थळ म्हणून नाही तर तीर्थक्षेत्र म्हणून पाथरीचा विकास होणार असेल तर त्यास आमची कोणतीही हरकत नसल्याची भूमिका शिर्डीतील ग्रामस्थ प्रतिनिधींनी बैठकीत मांडली. दोन्ही बाजूने ही भूमिका मान्य झाली. पाथरीचा साईबाबांचे जन्मस्थळ हा उल्लेख मुख्यमंत्र्यांनीही मागे घेतला. योजनेसाठी ‘पाथरी तीर्थक्षेत्र विकास’ हे नाव निश्चित झाले आणि वाद संपुष्टात आला. बैठकीबाबत ग्रामस्थांचे प्रतिनिधी म्हणून बैठकीसाठी उपस्थित राहिलेले खासदार सदाशिव लोखंडे यांनी समाधान व्यक्त केले. हा वाद शिर्डीकरांच्या बाजूने आता संपल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Comment