मेगा भरतीमुळेच भाजपने सत्ता गमावली – एकनाथ खडसे


जळगाव – माझ्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांना मेगा भरतीमुळेच फटका बसला त्याचबरोबर भाजपने देखील सत्ता गमावली. मेगा भरतीचा निर्णय चुकीचाच असल्याचे म्हणत भाजपचे नाराज नेते एकनाथ खडसेंनी पुन्हा एकदा भाजपला घरचा आहेर देत आपल्या मनातील खदखद त्यांच्या ‘मुक्ताई’ निवासस्थानी पत्रकारांसमोर बोलून दाखवली.

एकनाथ खडसे यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर आपली प्रतिक्रिया देताना पक्षाच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. खडसे पुढे म्हणाले, लोकसभा निवडणुकीच्या काळात भाजपने मेगा भरतीला सुरुवात केली. या मेगा भरतीला विधानसभा निवडणुकीच्या काळात जोर आला. मेगा भरतीच्या माध्यमातून भाजपने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना आपल्याकडे ओढले. पण ही मेगा भरती करत असताना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्या नेत्यांवर आम्ही भ्रष्टाचाराचे आरोप केले, ज्यांच्या विरोधात सतत दंड थोपटले, अशा नेत्यांनाच स्थान देण्यात आले.

भाजपच्या राज्य नेतृत्वाने याठिकाणी आपल्याच पक्षातील ज्येष्ठ नेत्यांचे म्हणणे ऐकून घेतले नाही. भाजपला विधानसभा निवडणुकीत मेगा भरतीमुळे 220 पेक्षा जास्त जागा सहज मिळतील, असे पक्षश्रेष्ठींना वाटत होते. त्यामुळे पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना निर्णय प्रक्रियेत डावलले काय आणि त्यांना तिकीट नाकारले काय? काही फरक पडत नाही, अशी भूमिका पक्षश्रेष्ठींनी घेतली. त्यानंतर मेगा भरतीत आयात केलेल्या नेत्यांना तिकिटांची खैरात वाटली. पण, प्रत्यक्ष उलटे झाले. भाजपने ज्यांना तिकिटे वाटली त्यांना जनतेने साफ नाकारले. मेगा भरतीचा फटका फक्त पक्षालाच नाही तर माझ्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांना देखील बसल्याचेही खडसे म्हणाले.

आताच्या महाविकास आघाडी सरकारमध्ये भाजपने केलेल्या मेगा भरतीचे मूळ आहे. या सरकारमधील नेत्यांना जर भाजपने आपल्या मेगा भरतीत स्थान दिले असते तर चित्र काहीसे निराळे राहिले असते. पण दुर्दैवाने तसे झाले नसल्याचेही यावेळी खडसे म्हणाले. आता आपली निर्णयाची चूक भाजपला लक्षात आल्यानेच प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आपली अशी प्रतिक्रिया दिली आहे. पुढे पक्ष आपली भूमिका बदलेल, असा चिमटा देखील त्यांनी काढण्याची संधी सोडली नाही.

यावेळी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्यावर खडसेंनी नाराजी व्यक्त करत त्यांच्यावर देखील टीकास्त्र डागले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांकडून पुरावे मागणे चुकीचेच नाही तर हा शुद्ध मूर्खपणा आहे. राऊत यांनी असे वक्तव्य करायला नको होते, असेही खडसेंनी यावेळी सांगितले. दरम्यान, पीकविमा कंपनीच्या मुद्यावरही त्यांनी मत मांडले.

Leave a Comment