सदाभाऊ खोतांची नव्या पक्षाची घोषणा


औरंगाबाद – लवकरच नवा राजकीय पक्ष स्थापन करणार असल्याचे माजी कृषी, पणनमंत्री आणि रयत क्रांती संघटनेचे सर्वेसर्वा सदाभाऊ खोत यांनी जाहीर केले आहे. हा पक्ष शेतकरी आणि मध्यमवर्गीय तसेच तरुणांच्या प्रश्नांवर लढण्यासाठी काम करेल, असे सदाभाऊ खोत यांनी यावेळी सांगितले. सदाभाऊ खोत औरंगाबाद येथे आयोजित रयत क्रांतीच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलत होते. एप्रिलमध्ये मुंबईत आपल्या पक्षाचे पहिले अधिवेशन हे होणार असल्याचे सांगताना त्यांनी पक्षाचे नाव काय असावे, झेंडा कसा असावा हे जनतेनेच १५ दिवसांत सुचवावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

युती सरकारच्या काळात एकेकाळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांचे अत्यंत निकटवर्तीय असलेले सदाभाऊ खोत त्यांच्यापासून दुरावले. त्यांची स्वाभिमानी संघटनेची मुलूखमैदानी तोफ असी ओळख होती. स्वाभिमानी संघटना गत विधानसभा निवडणुकीत युतीबरोबर होती. सदाभाऊ खोत यांना फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपदाची संधी देण्यात आली. पण, सत्ता आल्यानंतर काही काळातच सरकारच्या धोरणावर टीका करत राजू शेट्टी यांनी युतीचा पाठिंबा काढून घेतला. त्यावेळी त्यांनी सदाभाऊ खोत यांनाही राजीनामा द्यायला सांगितले होते. पण, खोत यांनी राजीनामा न देता युतीत कायम राहण्याचा मार्ग स्वीकारला. शेट्टी-खोत वाद त्यानंतर राज्यात चांगलाच रंगला. सदाभाऊ यांनी नंतर रयत क्रांती संघटना स्थापन केली. राजू शेट्टी यांच्या प्रत्येक आंदोलनाची खोत यांनी नंतर खिल्ली उडवली. आता सदाभाऊंनी नवीन पक्षाची स्थापना करणार असल्याचे जाहीर केले आहे.

Leave a Comment