दिल्लीच्या तख्तासमोर महाराष्ट्र कधीही झुकणार नाही – उद्धव ठाकरे


सांगली – राज्याचे पालक अशी केंद्र सरकारची भुमिका असते. पण जर राज्याला मदत देताना केंद्र सरकार नकारघंटा वाजवणार असेल. तर, महाराष्ट्रातील सरकार काही लेचे-पेचे नाही. दिल्लीच्या तख्तासमोर ते कधीही झुकणार नसल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सांगलीच्या इस्लामपूरमध्ये एका कार्यक्रमात बोलत होते.

महाराष्ट्राचे सरकार लेचे-पेचे नसल्यामुळे महाराष्ट्र मदतीत दुजाभाव करणाऱ्या दिल्लीसमोर कधीही झुकणार नसल्याचा इशाराच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रातील भाजप सरकारला दिला आहे. तसेच देशाची अर्थव्यवस्था कोमात गेली असून आधीचेच सरकार बरे होते, अशी टीकाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर केली आहे.

मोठ्या दिमाखात सांगलीच्या इस्लामपूर येथे वाळवा तहसील कार्यालयाच्या नूतन इमारतीचा लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी नूतन इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते संपन्न झाले. याप्रसंगी जलसंपदा मंत्री जयंत पाटील, ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ, सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील गृहराज्यमंत्री सतेज पाटील, कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम, वित्त व नियोजन राज्यमंत्री शंभूराजे देसाई यांच्यासह इतर अनेक मान्यवर मंडळी व इस्लामपूरकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या नव्या इमारतीचे निर्माण सुमारे 14 कोटी रुपये खर्चून करण्यात आले आहे. या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोहळ्याप्रसंगी बोलताना, वाळवा तहसील कार्यालय जनतेच्या विकासाला आणि त्यांना आधार देण्यासाठी कार्यरत राहील, अशी अपेक्षा व्यक्त केली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी बोलताना केंद्रातील भाजप सरकार सडकून टीका केली. आज कोमात देशाची अर्थव्यवस्था आहे. देशातील अर्थशास्त्रज्ञ हे देशातील अर्थव्यवस्था कोमात असल्याचे सांगत असल्यामुळे आपण गप्प बसायचे का ? आणि आपण अर्थव्यवस्थेला कोमातुन बाहेर काढण्यासाठी काही केले नाही, तर हे सरकार हवे कशाला ? त्यापेक्षा पहिले सरकार बरे होते, म्हणायची वेळ आली आहे. अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीका केली.

केंद्र सरकारकडून महाराष्ट्र राज्याला मदत देण्यात दुजाभाव होत असल्याच्या बाबतीत बोलताना, उल्लेख उद्वव ठाकरेंनी जयंत पाटील आणि हसन मुश्रीफ यांच्या एकमेकांच्या घट्ट मैत्रीचा केला, भाजपचे खासदार शिवसेना सोबत होती म्हणून निवडून आले आणि केंद्रात सत्ता आली पण आता राज्यातील जनतेच्या मागण्यांसाठी मदत करताना केंद्र सरकार दुजाभाव करत आहे. पण महाराष्ट्राची जनता आणि महाराष्ट्र सरकार लेचे-पेचे नाही. ते कोणत्याही मदतीसाठी दिल्लीसमोर अजिबात झुकणार नाही, असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी केला.

Leave a Comment