मुंबईकरांना लुटता येणार नाईटलाईफची मजा


देशाची आर्थिक राजधानी मुंबईत अमेरिकेतील शिकागो आणि इंग्लंडच्या लंडन प्रमाणे नाईटलाईफ सुरु होत असून यामुळे राजधानी मुंबई आता २४ तास जागी राहील. २७ जानेवारीपासून हा उपक्रम सुरु होत आहे. मुंबईच्या काही ठराविक भागात हॉटेल्स, रेस्टोरेंट, मॉल, दुकाने रात्रभर उघडी असतील. राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांची अनेक वर्षांची इच्छा त्यामुळे पूर्णत्वास जात आहे. या संदर्भात ठाकरे यांनी बीएमसी आयुक्त प्रवीण परदेशी आणि मुंबई पोलीसआयुक्त संजय बर्वे यांच्याबरोबर घेतलेल्या बैठकीत या निर्णयाला हिरवा कंदील दाखविला गेल्याचे समजते. या बैठकीला दुकाने,मॉल्स, हॉटेल आणि रेस्टोरंट प्रतिनिधी हजर होते.

मिळालेल्या माहितीनुसार मुंबईतील नाईटलाईफ साठी आदित्य ठाकरे २०१३ पासून प्रयत्नशील होते. २०१७ मध्ये या प्रस्तावाला विधानसभेत मंजुरी मिळाली होती मात्र गृहमंत्रालयाच्या परवानगीची प्रतीक्षा होती. कारण त्यामुळे शहराच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता होती. आदित्य यांच्या म्हणण्यानुसार मुंबई आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर आहे आणि त्यामुळे येथे २४ तास जीवनावश्यक वस्तू उपलब्ध व्हायला हव्यात. शिवाय त्यामुळे शहरात तीन पाळ्यात काम सुरु राहील आणि त्यामुळे १५ लाख लोकांना रोजगार मिळू शकेल. अखेर शिवसेना सरकारने त्यांची ही इच्छा पूर्ण केली आहे. याचा थेट फायदा पर्यटन वाढण्यास होणार आहे.

पहिल्या टप्प्यात वरळी, घाटकोपर, गोरेगाव भागातील २५ मॉल्स रात्रभर सुरु राहणार आहेत. अर्थात दुकाने सुरु राहिली तरी मद्यप्राशनाची परवानगी राहणार नाही तसेच रहिवासी भागातील दुकाने मॉल रात्रभर सुरु राहणार नाहीत. जेथे दुकाने मॉल रात्रभर सुरु राहणार आहेत तेथे सीसीटीव्ही आणि पार्किंगची व्यवस्था बंधनकारक आहे. सुरक्षेचा मुद्दा लक्षात घेऊन जागोजाग सीसीटीव्ही बसविले जात आहेत.

Leave a Comment