भाजपशासित राज्यात आंदोलकांना आम्ही कुत्र्यासारखे मारले


नवी दिल्ली – नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात देशभरात आंदोलन सुरू आहे. भाजपचे पश्चिम बंगाल प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी त्या पार्श्वभूमीवर वादग्रस्त वक्तव्य केले आहे. भाजपशासित उत्तर प्रदेश, आसाम आणि कर्नाटक राज्यात आम्ही नागरिकत्व सुधारणा कायदाविरोधी आंदोलकांना कुत्र्यासारखे मारल्याचे दिलीप घोष म्हणाले.

राज्यातील सार्वजनिक आणि खाजगी मालमत्तेचे नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधी आंदोलकांनी नुकसान केले आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे हे लोक मतदार असल्यामुळे ममता बॅनर्जी त्यांच्याविरूद्ध कुठल्याच प्रकारची कारवाई करत नाहीत. पण, भाजपची सत्ता असलेल्या उत्तर प्रदेश, आसाम आणि कर्नाटक राज्यात आम्ही नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधी आंदोलकांना कुत्र्यासारखे मारल्याचे घोष म्हणाले.

तुम्ही येथे येता, राहता, खाता आणि येथील सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करता. हीच का तुमची जमीनदारी? असा सवाल घोष यांनी केला. तसेच आम्ही येथील मालमत्तेचे नुकसान केल्यास तुम्हाला मारू आणि तुरुंगात टाकू, असेही ते म्हणाले. पश्चिम बंगालमध्ये नागरिक्तव सुधारणा कायद्याविरोधात आंदोलन सुरू आहे.

आंदोलकांनी काही दिवसांपूर्वी अनेक भागांमध्ये बस, रेल्वेगाड्यांना आगी लावल्या होत्या. बंगालमधील बेलदंगा रेल्वे स्थानकाला आंदोलकांनी पेटवल्यामुळे कोरोमंडल एक्स्प्रेसला हावडामधील उलुबेरिया स्थानकाजवळच थांबवण्यात आली होती. तर, दक्षिण-पश्चिम रेल्वेमार्गावरील सर्व गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. यावेळी ममता बॅनर्जी यांनी आंदोलकांना राज्यात तोडफोड केल्यास कठोर कारवाईचा इशारा दिला आहे.

Leave a Comment