योग्य वेळी फडणवीसांना उद्धव ठाकरेंनी लाथाडले – अबु आझमी


वर्धा – योग्य वेळी देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लाथडले, असे वक्तव्य समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी वर्ध्याच्या स्थानिक विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये केले आहे.

आझमी यावेळी नागरिकत्व सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीबाबत बोलताना म्हणाले, की देशातील झोपलेले लोक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उचललेल्या या पावलामुळे जागे झाले आहेत. आज संपूर्ण देश या कायद्यांविरोधात आंदोलनासाठी एकत्र आला आहे. तसेच, मी एका गोष्टीबाबत महाराष्ट्रातील अल्पसंख्यांकांचे अभिनंदन करू इच्छितो. ते म्हणजे, योग्य वेळी फडणवीसांना उद्धव ठाकरे यांनी लाथ मारून, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले. अन्यथा सध्या जे उत्तर प्रदेशमध्ये सुरू आहे, तेच येथेही झाले असते.

ते पुढे म्हणाले, की कार्यकर्ते जोडण्यास समाजवादी पक्षाने सुरूवात केली आहे. हा कार्यक्रम १६ जानेवारीपर्यंत चालणार आहे. मोदी जर सीएए आणि एनआरसीबाबत मानले नाहीत, तर काश्मिर ते कन्याकुमारीपर्यंत इंग्रजकाळाप्रमाणे असहकार आंदोलन पुकारले जाईल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

Leave a Comment