शेतकरी आत्महत्येमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर


नवी दिल्ली : राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाने (NCRB) देशातील शेतकरी आत्महत्येची धक्कादायक आकडेवारी समोर आणली आहे. त्यांनी दिलेल्या आकडेवारीनुसार तब्बल 10 हजार 349 शेतकऱ्यांनी 2018 या एकाच वर्षात आत्महत्या केली. त्यापेक्षा धक्कादायक म्हणजे सर्वाधिक आत्महत्या या महाराष्ट्रात झाल्या आहेत. शेतकरी कर्जमाफी फडणवीस सरकारच्या काळात होऊनही, महाराष्ट्रात तब्बल 3 हजार 594 शेतकऱ्यांनी आयुष्य संपवले. महाराष्ट्रात शेतकऱ्यांसह विविध आत्महत्यांचा गेल्या वर्षात हा आकडा 17 हजार 972 वर पोहोचला आहे. यामध्ये 3594 शेतकऱ्यांचा समावेश आहे.

विशेष म्हणजे गेल्या वर्षात बिहारसारख्या राज्यात एकाही शेतकरी किंवा शेतमजुराने आत्महत्या केल्याची नोंद नाही. राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या आकडेवारीनुसार, 2018 मध्ये देशात 5763 शेतकरी आणि 4586 शेतमजुरांनी आत्महत्या केली. ही आकडेवारी केवळ एकाच वर्षातील आहे. तर शेतकऱ्यांशिवाय अन्य नागरिकांनीही आत्महत्या केल्या आहेत, या सर्वांचा आकडा मिळून 2018 मध्ये देशात 1 लाख 34 हजार 516 जणांनी आत्महत्या केली. यामध्ये महाराष्ट्रात 17 हजार 972 जणांनी आत्महत्या केल्या आहेत. देशात सर्वाधिक आत्महत्या महाराष्ट्रात झाल्या आहेत.

शेतकऱ्यांसह विविध आत्महत्येचे महाराष्ट्रात प्रमाण सर्वाधिक असताना, तिकडे बिहारमध्ये एकाही शेतकऱ्याने आत्महत्या केलेली नाही. आकडेवारीनुसार पश्चिम बंगाल, बिहार, ओदिशा, उत्तराखंड, मेघालय, गोवा, चंदीगड, दमन आणि दीव, दिल्ली, लक्षद्विप आणि पुद्दुचेरी या राज्यांमध्ये 2018 मध्ये एकाही शेतकऱ्याने आत्महत्या केली नाही.

राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागानुसार, आत्महत्येच्या प्रमाणात 2018 मध्ये 3.6 टक्के वाढ झाली आहे. 2017 मध्ये 1 लाख 29 हजार 887 जणांनी आत्महत्या केली होती. 2018 मध्ये देशात 1 लाख 34 हजार 516 जणांनी आत्महत्या केली. यंदा आत्महत्येमध्ये महाराष्ट्र 17,972 घटनांसह पहिल्या, तामिळनाडू 13896 आत्महत्येसह दुसऱ्या तर पश्चिम बंगाल 13255 आत्महत्येसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.

Leave a Comment