नक्कीच तुमच्या पसंतीस उतरेल दीपिकाचा ‘छपाक’


उद्या बॉक्स ऑफिसवर दीपिका पादुकोण अभिनीत आणि मेघना गुलजार दिग्दर्शित ‘छपाक’ हा चित्रपट झळकणार आहे. अॅसिड हल्ला पीडिता लक्ष्मी अग्रवाल हिच्या खऱ्याखुऱ्या आयुष्यातील घटनांवर आधारलेला हा चित्रपट प्रेक्षकांच्या अंगावर शहारे उभे करण्यात यशस्वी होतो. दीपिका पादुकोण चित्रपटात लक्ष्मीच्या भूमिकेत दिसते. मेघना गुलजार यांनी दर्शकांना पसंत पडेल अशा पद्धतीने लक्ष्मीची कहाणी प्रेक्षकांसमोर आणली आहे.

‘मालती’ नावाच्या मुलीभोवती या चित्रपटाची कथा फिरते. मालती एक सरळ साधी मुलगी, जिने खूप स्वप्न पाहिली आहेत आणि तिच्या मनात ती स्वप्न पूर्ण करण्याची जिद्दही आहे. त्यासाठी तिला पुढे जायचे आहे. तिला आपल्या कुटुंबासाठी काहीतरी भरीव करायचे आहे. पण उडण्याची स्वप्न पाहणाऱ्या मालतीच्या पंखावर अॅसिड हल्ल्याचे सावट पडते आणि तिच्या आयुष्याला वेगळीच कलाटणी मिळते. मालतीची सगळी स्वप्न अॅसिड हल्ल्यानंतर धुळीला मिळतात आणि तिच्या आत्मविश्वासाचे खच्चीकरण होते.

पण, या दरम्यान एका पत्रकार म्हणजेच अमोलशी मालतीची भेट होते. विक्रांत मेस्सी अमोलच्या भूमिकेत दिसतो. अॅसिड हल्ला पीडितांना मदत करणाऱ्या, त्यांना उपचारासाठी मदत करणारी एक एनजीओशी अमोल निगडीत आहे. तो मालतीलाही या कामामध्ये सहभागी करून घेतो. एनजीओमध्ये दाखल झाल्यानंतर मालतीची कायदेशीर लढाई सुरू होते. या लढाईत तिला आणखी दोघांची मदत मिळते. येथे तिला एक वेगळी ओळखही मिळते आणि त्याचमुळे ती लोकांची प्रेरणास्रोतही बनते.

अॅसिड हल्ला पीडितांची दु:ख, त्यांचा संघर्ष दीपिकाने मोठ्या पडद्यावर कष्टाने उभा केलेला दिसतो. चित्रपटात कुठेही दीपिकाचा ग्लॅमरस अवतार पाहायला मिळत नाही, पण तरीदेखील ती प्रेक्षकांच्या लक्षात राहील. चित्रपटात विक्रांत मेस्सीदेखील प्रेक्षकांचे लक्ष आपल्याकडे खेचून घेतो.

तलवार, राजीनंतर आता छपाकमुळे दिग्दर्शिका मेघना गुलजारचे हे चित्रपटातील तिच्या वेगळ्या कामाची साक्ष देतात. आता मेघनाला दर्शकांना कोणत्या पद्धतीचे चित्रपट बघायचे असतात हे चांगलेच कळाले आहे. चित्रपटातील काही दृश्ये प्रेक्षकांच्या अंगावर काटे उभे करतात तर काही पुन्हा पुन्हा आल्यासारखे वाटू शकतात. त्याचबरोबर चित्रपटातील ‘उन्होंने मेरी सूरत बदली है…मेरा मन नहीं’, चित्रपट पाहून थिएटरबाहेर पडल्यानंतरही हा डायलॉग तुमच्या मनात नक्कीच घोळत राहतो आणि याचमुळे हा चित्रपट यशस्वी ठरतो.

अतिका चौहान आणि मेघनाने या चित्रपटाचे संवाद लिहिले असून हे संवाद प्रेक्षकांनाही विचार करायला लावण्यासाठी भाग पाडतात. शंकर – एहसान – लॉय यांनी चित्रपटाला संगीत दिले आहे.

Leave a Comment