संघ विचारसारणीच्या कुलगुरुंच्या नियुक्त्या रद्द करा – आशिष देशमुख


मुंबई : काँग्रेसचे नेते आणि माजी आमदार आशिष देशमुख यांनी संघ विचारसारणीच्या कुलगुरु आणि प्र-कुलगरु यांच्या नियुक्त्या रद्द कराव्यात, अशी मागणी केली आहे. दिल्लीच्या जवाहरलाल नेहरु विद्यापीठाचे (जेएनयू) कुलगुरु हे संघाच्या विचारसारणीचे असल्यामुळे तेथे काय झाले हे साऱ्या देशाने पाहिले आहे. राज्यात तशी स्थिती निर्माण होऊ नये यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटणार असल्याचे आशिष देशमुख यांनी म्हटले आहे.

जो हल्ला जेएनयूमधील विद्यार्थ्यांवर झाला त्यामध्ये अभाविप आणि भाजपच्या गुंडांना नक्कीच तेथील विद्यापीठ प्रशासनाची साथ मिळाली असणार आहे. कुलकुरु जगदीश कुमार हे देखील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचेच सदस्य आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या कार्यकाळात गेल्या पाच वर्षात राज्यातील प्रत्येक विद्यापीठांमध्ये कुलगुरु, प्र-कुलगुरु आणि निबंधक या पदांवर संघाच्या विचारांच्या लोकांना भरणा झाला असल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना माझी विनंती आहे की, जेएनयू सारखी स्थिती राज्यातील विद्यापीठांमध्ये निर्माण होऊ नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून विद्यापीठांमधील संघाच्या विचारसरणीच्या कुलगुरुंच्या नियुक्त्या रद्द केल्या पाहिजेत, अशी मागणी आशिष देशमुख यांनी केली.

राष्ट्रीय स्वंयसेवक संघाने शालेय किंवा महाविद्यालयीन शिक्षणावर प्रभाव टाकला आहे. त्यांचे लोक त्यासाठी विद्यापीठांमध्ये महत्त्वाच्या पदांवर बसवले आहेत. म्हणून संघ विचाराच्या प्रत्येक विद्यापीठातील लोकांच्या नियुक्त्या रद्द करायला हव्यात. अन्यथा येत्या काळाच भाजपप्रणित संघटनांचे लोक राज्यातील विद्यापीठांतील वातावरण खराब करु शकतात आणि ते आम्हाला थांबवायचे असल्याचे आशिष देशमुख यांनी म्हटले आहे.

Leave a Comment