सरकारने घेतला राष्ट्रीय महामार्गांवरील स्पीडब्रेकर काढून टाकण्याचा निर्णय


नवी दिल्ली – वेगाने जाणाऱ्या वाहनांचा वेग कमी व्हावा आणि त्याद्वारे अपघाताची शक्यता देखील कमी व्हावी असा स्पीडब्रेकर अर्थात गतिरोधकांचा मूळ उद्देश असताना देखील जास्त प्रमाणात तसेच खूप उंचीचे स्पीडब्रेकर अनेकदा रस्त्यांवर असतात, की त्यांच्यामुळेच अपघात होईल की काय? अशी शंका मनात निर्माण होते. महामार्गावर तर वेगाने येणाऱ्या वाहनांना मध्येच येणाऱ्या स्पीडब्रेकरचा मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. पण, या स्पीडब्रेकरपासून आता वाहनचालकांची सुटका होणार आहे. देशातील सर्व महामार्गांवरचे स्पीडब्रेकर हटवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. विशेषत: टोलनाक्यांजवळचे स्पीडब्रेकर हटवण्याला प्राधान्य देण्यात येणार असल्यामुळे वाहनचालकांसाठी पर्वणीच असल्याचे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

नुकतीच देशात फास्टॅग प्रणाली रस्ते व वाहतूक विभागाने लागू केली. यापुर्वी टोलनाक्यांवर टोल भरण्यासाठी वाहनांना थांबावे लागत होते. पण वाहनांना फास्टॅगमुळे टोलनाक्यावर थांबण्याची आवश्यकता उरली नाही. त्या पार्श्वभूमीवर महामार्गांवरचे स्पीडब्रेकर देखील हटवण्याचा निर्णय घेण्यात आला असल्यामुळे अडथळ्यांविना प्रवास करणे वाहनांना शक्य होणार आहे. दरम्यान, या निर्णयामुळे वाहने थांबत थांबत चालल्यामुळे होणारा इंथनाचा अपव्यय टाळता येईल, असा अंदाज आहे. तसेच, वेळेची देखील बचत होऊ शकते. विशेष म्हणजे वाहनचालकांना विनात्रास प्रवास करणे शक्य होणार आहे.

Leave a Comment