15 हजार कर्मचाऱ्यांनी ठोकला अॅक्सिस बँकेला रामराम


मुंबई : मागील काही महिन्यांत अ‍ॅक्सिस बँकेच्या 15 हजार कर्मचाऱ्यांनी बँकेला रामराम ठोकला आहे. प्रसारमाध्यमांमध्ये आलेल्या बातम्यांनुसार कर्मचाऱ्यांना बँकेचे व्यवस्थापन बदलल्यामुळे काम करण्यात अडचणी येतात. यामुळे मध्यम स्तरावर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना बँकेची नोकरी सोडली आहे.

अ‍ॅक्सिस बँकेच्या एमडी आणि सीईओ शिखा शर्मा यांनी पद सोडल्यानंतर अ‍ॅक्सिस बँकेने या पदावर अमिताभ चौधरी यांची नियुक्ती केली. 3 वर्षांचा त्यांचा कार्यकाळ आहे. 2010 पासून अमिताभ चौधरी HDFC स्टँडर्ड लाइफ इन्शुरन्सचे सीईओ आणि एमडी ही होते.

या संदर्भात इकॉनॉमिक टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, काही वरिष्ठ लोकांनी गेल्या काही महिन्यांत बँकेचे काम सोडले आहे. बँकेमध्ये काळाच्या ओघात झालेले बदल हे यामागचे कारण सांगितले जात असून बँक नव्या लोकांना वेगाने भरती करत असल्याचे बँकेचे म्हणणे आहे.

मोठा बदल बँकेच्या यंत्रणेत करण्यात आला आहे. बँकेच्या कर्मचाऱ्यांना या नव्या बदलांमुळे त्यांच्या कामाबद्दल चिंता वाटत होती. या सगळ्या बदलांशी ते जमवून घेऊ शकत नव्हते, असे बँकेच्या एका कर्मचाऱ्याने सांगितले. अ‍ॅक्सिस बँकेने या आर्थिक वर्षात एकूण 28 हजार लोकांना नोकरीमध्ये ठेवले होते. बँकेने जानेवारी ते मार्च या तिमाहीत 4 हजार कर्मचाऱ्यांना नोकरी देण्याची योजना तयार केली आहे.

नियंत्रकांची बँकेला मंजुरी मिळाल्यानंतर अॅक्सिस बँक इन्शुरन्स क्षेत्रात पाऊल ठेवेल, असे बँकेचे एमडी आणि सीईओ अमिताभ चौधरी यांनी सांगितले. अॅक्सिस बँक इन्शुरन्सची मोठी डिस्ट्रिब्युटर आहे. रेग्युलेटरी मंजुरी मिळाल्यानंतर ही बँक इन्शुरन्स क्षेत्रात जाईल. रिझर्व्ह बँकेने रेग्युलेटरी बदल केले आहेत. जास्त भागीदारीची बँकांना इन्शुरन्समध्ये मंजुरी नसल्यामुळे अ‍ॅक्सिस बँक नवी इन्शुरन्स कंपनी काढणार नाही पण एखादी चांगली इन्शुरन्स कंपनी खरेदी करण्यावर अ‍ॅक्सिस बँकेची नजर आहे.

Leave a Comment