रोहित शर्माकडून ऋषभ पंतची पाठराखण


नवी दिल्ली – गेल्या काही दिवसांमध्ये भारतीय संघासाठी यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंतचा फलंदाजी आणि यष्टीरक्षणातील खराब फॉर्म हा चिंतेचा विषय बनला आहे. भारतीय संघाचे आव्हान २०१९ विश्वचषकात संपुष्टात आल्यानंतर धोनीला भारतीय निवड समितीने विश्रांती देत, पंतला संघात संधी दिली. त्याचबरोबर यापुढील सर्व मालिका आणि टी-२० विश्वचषकासाठी ऋषभ पहिल्या पसंतीचा यष्टीरक्षक असेल असेही जाहीर केले. पण मिळालेल्या संधीचा फायदा पंतला उचलता आला नाही, ऋषभची काही ठराविक अपवाद वगळता सर्व सामन्यांत निराशाजनक कामगिरी सुरुच राहिली आहे. पण अशा परिस्थितीतही संघाचा सलामीवीर रोहितने ऋषभची पाठराखण केली आहे.

ऋषभ पंतशी मी काही दिवसांपूर्वी बोलत होतो. तो बिचारा आता २१-२२ वर्षांचा आहे, तरीही त्याने प्रत्येक सामन्यात शतक झळकावे अशी लोकांची अपेक्षा असते. तू असे कर, तू तसे कर असे प्रत्येक जण त्याला सांगत असतो. हा फालतुपणा थांबायला हवा. त्याला मी सांगितली की तू स्वतःभोवती एक वलय निर्माण कर की ज्यामध्ये कोणत्याही नकारात्मक गोष्टी येणार नाहीत. तुझ्याबद्दल लोक बोलत राहतील, त्यांना बाहेर बोलत राहू दे…त्याच्याकडे तू लक्ष देऊ नकोस. जे तुला योग्य वाटते तेच तू कर. कोणास ठावूक हा सल्ला त्याच्या कामाला येईल, मला स्वतःला याचा फायदा झाला होता.

यादरम्यान, आपल्या संघातील तरुण खेळाडूंचे रोहितने कौतुकही केले. एकाच वेळी संघात लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, शिवम दुबे हे खेळाडू एकत्र खेळले नाही. त्यांच्यावर ज्यावेळी जबाबदारी येईल त्यावेळी त्यांच्या खेळात आत्मविश्वास येईल. आता गोष्टी बदलत आहेत. चौथ्या क्रमांकावर श्रेयस अय्यर चांगली कामगिरी करत आहे. ऋषभने विंडीजविरुद्ध वन-डे मालिकेतही चांगली कामगिरी केली. आता श्रेयसला माहिती झाले आहे की चौथ्या क्रमांकावर तो फलंदाजी करणार आहे. तो आता आपल्या ठरलेल्या रणनितीसारखा खेळू शकतो. इतरांनाही अगोदर संघातील आपली जागा पक्की करावी लागेल. दरम्यान रोहित ऑस्ट्रेलियाविरुद्ध वन-डे मालिकेतून भारतीय संघात पुनरागमन करणार आहे.

Leave a Comment