भविष्यात कोणत्याही पक्षासोबत मनसेची राजकीय समिकरणे जुळू शकतात


मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. सत्तास्थापना, त्यानंतरचे नाराजीनाट्य अशा अनेक घडामोडींनंतर राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणारी घटना आता घडण्याची शक्यता आहे. कारण भविष्यात भाजपसोबत झेंडा भगवा करुन हिंदुत्ववादाची कास धरण्याचा प्रयत्न करणारी महाराष्ट्र नवनिर्माण सेना जाऊ शकते, असे खळबळजनक वक्तव्य मनसेचे दिग्गज नेते बाळा नांदगावकर यांनी केले आहे.

यासंदर्भातील वृत्त एबीपी माझा या वृत्तवाहिनीने दिले असून या वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत भविष्यात कोणत्याही पक्षासोबत मनसेची राजकीय समिकरणे जुळू शकतात, असे वक्तव्य मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी केले आहे. नांदगावकरांच्या या विधानानंतर मनसे आणि भाजप भविष्यात एकत्र येणार की काय? अशा चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आले आहे.

धर्मनिरपेक्ष पक्षांसोबत शिवसेना गेली असल्याने मनसेचा हिंदुत्ववादी पोकळी भरुन काढण्याचा प्रयत्न आहे आणि मनसे आता त्यासाठीच हिंदुत्वाचा विचार करत भगवा रंग धारण करणार आहे. राजकीय क्षितिजावर मोदी-शहांना दिसून देऊ नका, असे म्हणणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे आता आपले अस्तित्व टिकवण्यासाठी त्यांचीच साथ घेणार का, असा सवालही उपस्थित होत आहे. कारण महाराष्ट्र नवनिर्माण सेना भविष्यात भाजपसोबतही जाऊ शकते असे वक्तव्य मनसेचे दिग्गज नेते बाळा नांदगावकर यांनी केले आहे. दरम्यान, मनसेचा झेंडा बदलणार असल्याच्या चर्चाही राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत.

आता राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना भगवी होणार असल्याची चर्चा आहे. कारण तब्बल 14 वर्षांनी राज ठाकरे यांच्या पक्षाचा झेंडा बदलण्याची शक्यता आहे. मनसेच्या झेंड्यात मध्यभागी भगवा (अधिक प्रमाणात) तर वरच्या बाजूला निळा तर खालील बाजूस हिरवा रंग आहे. मनसेचा हा झेंडा आता बदलणार आहे. मनसेचा नवा झेंडा हा संपूर्णपणे भगवा असेल, अशी माहिती मिळाली आहे. आता दुसऱ्या कोणत्याही रंगाचा झेंड्यात समावेश नसेल. छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा या नव्या झेंड्यामध्ये असेल. नव्या झेंड्यामध्ये मनसेचे निवडणूक चिन्हदेखील नसेल, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.

मनसेच्या या नव्या झेंड्याचे रुप पाहिले, तर पूर्णपणे हिंदुत्वाच्या मार्गावर मनसे राहणार, अशी शक्यता निर्माण झाली आहे. त्याचेच संकेत भगवा रंग आणि शिवरायांची राजमुद्रा देत आहेत. कदाचित धर्मनिरपेक्ष पक्षांसोबत शिवसेना ही सत्तेत गेल्याने हिंदुत्त्ववादी मतांना आकर्षित करण्यासाठी आणि शिवसेनेची कट्टर हिंदुत्वाची जागा भरुन काढण्यासाठी हा बदल केला असावा, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

पक्षाची सर्वसमावेशकता सध्याच्या मनसेच्या झेंड्याच्या रंगांमध्ये दडली होती. पण सध्याच्या ध्रुवीकरणाच्या राजकारणात एकगठ्ठा मतदानाला जास्त महत्त्व प्राप्त झाले आहे. आघाडीच्या वळचणीला शिवसेना ही गेल्याने कट्टर हिंदुत्ववादी मतदारांना पर्याय हवा आहे. राज ठाकरे तोच पर्याय बनण्याचा प्रयत्न करत आहेत का? हे 23 तारखेलाच कळेल, कारण शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची 23 जानेवारी रोजी जयंती आहे. मनसे त्यांच्या नव्या झेंड्याचे अनावरण याच दिवशी करणार असल्याचे म्हटले जात आहे.

Leave a Comment