15 लाखाचे आश्वासन पूर्ण केले नाही म्हणून मोदी, शहा, आठवलेंविरोधात खटला दाखल


रांची – रांचीच्या कनिष्ठ न्यायालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्याविरोधात खटला दाखल करण्यात आला आहे. 15 लाख रुपये देण्याचे लोकसभा निवडणुकीत दिलेले आश्वासन पूर्ण न केल्यामुळे या तिघांवर जनतेची फसवणूक आणि दिशाभूल केल्याचा आरोप करण्यात आला आहे. हा खटला रांचीमधील डोरंड येथील रहिवासी आणि झारखंड उच्च न्यायालयाचे वकील हरेंद्र कुमार सिंह यांनी दाखल केला असून 1 फेब्रुवारी रोजी या प्रकरणाची सुनावणी होणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परदेशातून काळा पैसा आणून सर्व भारतीयांच्या खात्यात 15 लाख रुपये जमा करण्याची लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान घोषणा केली होती. तसेच प्रत्येक वर्षी 3 लाख नोकऱ्या देण्याचे आश्वासनही मोदींनी दिले होते. भाजपच्या घोषणापत्रात या सर्व आश्वासनांचा समावेश होता. हे आश्वासन त्यांनी पूर्ण केले नाही. जनतेची फसवणूक करून मोदींनी बहुमत मिळवले. मोदींसोबतच भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनीही अशाच स्वरुपाचे आश्वासन दिले होते. त्यानंतर काही दिवसांनी अमित शहा यांनी एका वृत्तवाहिनीला बोलताना ही केवळ निवडणुकीपुरती घोषणा होती, अशी कबुली दिली होती. त्यामुळे तक्रारदाराने न्यायालयाला हा पुरावाही दिला आहे.

पंतप्रधान मोदी, अमित शहा यांच्यासोबतच रामदास आठवले यांच्यावरही खटला दाखल करण्यात आला आहे. 18 डिसेंबर 2018 मध्ये रामदास आठवले यांनी सांगलीमध्ये जनतेशी संवाद साधताना भारतात काळा पैसा आल्यावर प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख रुपये जमा केले जातील, असे आश्वासन दिल्यामुळे आठवले यांनीही जनतेची फसवणूक केली असल्याचे तक्रारदाराने म्हटले आहे.

Leave a Comment