पाकच्या खुरापत्या थांबल्या नाहीतर भारताकडे ‘स्ट्राईक’ अधिकार


नवी दिल्ली – दहशतवादाला आपला शेजारी देश पाकिस्तान खतपाणी घालत असून त्यांनी भारताविरुद्ध पुकारलेले छुप्पे युद्ध आणि दहशतवादी खुरापत्या थांबवल्या नाहीतर ‘स्ट्राईक’ करण्याचा अधिकार भारताकडे असल्याचा इशारा नवनियुक्त लष्कर प्रमुख मनोज मुकुंद नरवणे यांनी पाकिस्तानला दिला आहे. भारताकडे पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाला उत्तर देण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. भारत कोणताही हल्ला परतावून लावण्यासाठी सज्ज असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

सीमेवर मागील काही दिवसांपासून शस्त्रसंधीचे उल्लंघन वाढले असून भारताला याची जाणीव आहे. दहशतवाद्यांचे तळ पाकिस्तानच्या बाजूने असून भारतात येण्याच्या प्रयत्नात ते आहेत, मात्र, भारत पूर्णतः तयार असल्याचे लष्करप्रमुख म्हणाले. आपली सुरक्षा यंत्रणा दहशतवादी हल्ला परतवून लावण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे. दहशतवाद्यांबाबत माहिती मिळताच सुरक्षा यंत्रणांच्या व्यूहरचनेत योग्य ते बदल करण्यात येतात. तसेत पाकिस्तानच्या कोणत्याही आगळीकीला उत्तर देण्यासाठी भारत तयार असल्याचे नरवणे म्हणाले.

Leave a Comment