पुन्हा काँग्रेसवासी होणार विखे पाटील?


अहमदनगर – काँग्रेस पक्षाला विधानसभा निवडणुकीदरम्यान सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये दाखल झालेले राधाकृष्ण विखे पाटील पुन्हा काँग्रेसच्या वाटेवर असल्याच्या चर्चा सुरु आहेत. त्यामागे कारणही अगदी तसेच आहे. अहनदनगर जिल्ह्यातील घडामोडींना सध्याच्या घडीला वेगळे वळण लागले आहे. विखे पिता-पुत्रांवर नगर जिल्ह्याच्या स्थानिक भाजप नेत्यांकडून टीका केली जात असल्यामुळे या वादविवादांना कंटाळून विखे पाटील पुन्हा काँग्रेसमध्ये जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान नागपुरात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेतली असल्याची माहिती समोर आली होती. खर्गे आणि विखे पाटील यांच्यात नागपूरच्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये बैठक झाल्याची चर्चा सुरु होती. पण हे वृत्त खर्गे यांनी फेटाळले आहे. विखे पाटील आणि आपली कोणत्याही प्रकारची भेट झाली नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीत भाजपमध्ये प्रवेश करुन भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. त्यात त्यांचा विजय झाला. पण, या निवडणुकीत नगर जिल्ह्यात भाजपला हवे तसे यश मिळाले नाही. विशेष म्हणजे माजी मंत्री राम शिंदे यांचा देखील या निवडणुकीत पराभव झाला. २०१४ च्या निवडणुकीत भाजपच्या नगर जिल्ह्यात ४ जागा जिंकून आल्या होत्या. मात्र, २०१९च्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या फक्त ३ जागा जिंकून आल्या.

भाजपला विधानसभा निवडणुकीत नगर जिल्ह्यात अपयश आल्यामुळे विखे पाटील पिता-पुत्रांवर तेथील स्थानिक भाजप नेत्यांनी निशाना साधला. पाडापाडीच्या राजकारणाची विखे पाटील यांच्यावर टीका करण्यात आली. अखेर शुक्रवारी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबईत या संदर्भात बैठक पार पडली. या बैठकीत दोन्ही बाजूंच्या भूमिका ऐकूण घेण्यात आल्या. या प्रकरणी विजय पुराणिक यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती याप्रकरणावर निर्णय देणार आहे.

Leave a Comment