अहिंसेच्या लसीमुळे आपण नपुंसक झालो – शरद पोंक्षे


ठाणे – अभिनेते शरद पोंक्षे यांनी देशभरात होत असलेल्या हिंसेचे समर्थन करत अहिंसेची लस आपल्या देशाने टोचून घेतल्यामुळे आपला समाज नंपुसक झाल्याची लाज वाटायला पाहिजे, असे वक्तव्य केले आहे. तसेच महात्मा गांधी यांच्या अहिंसा परमोधर्म या विचाराची त्यांनी अप्रत्यक्षपणे खिल्ली उडवली आहे. शरद पोंक्षे कल्याण येथील ओक हायस्कुलमध्ये ३१ वे अखिल भारतीय स्वा. सावरकर संमेलनाच्या समारोप सोहळ्यात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.

ते पुढे बोलताना म्हणाले, मला कधीच मुसलमानांची भीती वाटत नसल्याचे सावरकरही बोलायचे. एखाद्या कार्यक्रमात बोलताना मुसलमान भारत नव्हे तर हिंदुस्थानच म्हणतात. याचा अर्थ त्यांनीही मान्य केला की भारत हा देश हिंदुंचा आहे. ज्याच्यासोबत ‘शत्रुचा शत्रू आपला मित्र’ हा उद्देश ठेवून मैत्री केली तो नागच निघाला. नागाला माणसाने कितीही दूध पाजले तरीही तो डसणारच ! असे वादग्रस्त वक्तव्य करीत अभिनेता शरद पोंक्षे यांनी भाजप-शिवसेना युतीच्या काडीमोडात उडी घेतली. भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते माधव भंडारी, सावरकार अभ्यासक सच्चिदानंद शेवडे, कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष माजी आमदार नरेंद्र पवार, माजी आमदार प्रभाकर संत आदी यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.

पोंक्षे पुढे म्हणाले, दोन्ही पक्षांनी मुख्यमंत्री पदावर अस्तित्वाचा प्रश्न निर्माण केल्यामुळे वेगळीच मैत्री आज उदयास आली. यावर काल्पनिक कथा मांडून महापुरात जीव वाचविण्यासाठी ज्या झाडावर माणसू चढला होता. त्याच झाडावर नागही होता. या दोघांनाही जीव जाण्याच्या भीतीने मैत्री केली. पण, या मैत्रीत आज कटुता निर्माण झाली, असे सांगत त्यांनी भाजपला माणसाची तर शिवसेनेला नागाची उपमा दिली.

Leave a Comment