भारतीय संघात जसप्रीत बुमराहची वापसी


मुंबई, : वेस्ट इंडिजविरुद्ध टी -20 आणि एकदिवसीय मालिकेनंतर टीम इंडिया आता पुढील वर्षी श्रीलंकेविरुद्ध पहिली मालिका खेळणार आहे. यासाठी भारतीय संघाची आज घोषणा करण्यात आली. रोहित शर्मा आणि मोहम्मद शमीला श्रीलंकाविरोधात होणाऱ्या टी-20 मालिकेत विश्रांती देण्यात आली आहे. तर, टीम इंडियात दुखापतग्रस्त शिखर धवनने पुनरागमन केले आहे.

5 जानेवारीपासून भारत आणि श्रीलंका यांच्यात आणि 14 जानेवारीपासून ऑस्ट्रेलिया विरुद्ध मालिका सुरू होणार आहे. टी-20 मध्ये रोहितला विश्रांती देण्यात आली असली तरी, त्याला ऑस्ट्रेलियाविरुद्ध संघात स्थान देण्यात आले आहे. 2019मध्ये वर्षभर रोहित शर्मा क्रिकेट खेळत आहे. टी-20, एकदिवसीय आणि कसोटी तिन्ही फॉरमॅटमध्ये रोहितने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यामुळे 5 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या श्रीलंका दौऱ्यासाठी रोहित शर्मा उपलब्ध राहणार नाही आहे.

बीसीसीआयच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या पुढच्या वर्षी ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपच्या दृष्टीने भारतीय संघ तयारी करत असल्यामुळे निवड समिती फॉर्ममध्ये असलेल्या खेळाडूंनी विश्रांती देण्याचा विचार करणार नाही. पण रोहित शर्मा गेल्या वर्षभरापासून क्रिकेट खेळत असल्यामुळे बोर्डच्या वतीने श्रीलंका दौऱ्यात रोहितला विश्रांती दिली. भारतीय संघ श्रीलंकाविरुद्ध तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. 5 जानेवारीपासून ही मालिका गुवाहाटी येथून सुरू होईल. त्यानंतर इंदूरमध्ये 7 जानेवारी रोजी दुसरा सामना होईल. तर पुण्यात तिसरा आणि शेवटचा सामना होणार आहे.

राष्ट्रीय क्रिकेट अकादमी आणि जसप्रीत बुमराह यांच्यात काही दिवसांआधी वाद झाला होता. बुमराहची फिटनेस टेस्ट घेण्यास राहुल द्रविडने नकार दिला होता. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी बुमराहला फ्रॅक्चर झाले होते. यानंतर भारतीय वेगवान गोलंदाज बुमराह केवळ दक्षिण आफ्रिकेविरूद्धच नाही तर बांगलादेशविरूद्धही मालिकेत खेळू शकला नाही. मात्र आता बुमराह कमबॅक करत आहे.

Leave a Comment