देशभरात सर्वत्र सध्या नागरिकत्व दुरूस्ती कायद्याविरोधात (CAA) आंदोलने सुरू आहेत. या आंदोलनांना काही ठिकाणी हिंसक वळणही मिळाल्यामुळे देशातील अनेक ठिकाणी इंटरनेट सुविधाही खंडित करण्यात आली होती. बॉलिवूडकरही या आंदोलनामध्ये उतरले आहेत. अभिनेता फरहान अख्तरने काही दिवसांपूर्वी या कायद्याला विरोध दर्शवणारे एक ट्विट केले होते. पण त्या ट्विटमुळे फरहान आला गोत्यात आला आहे.
Here’s what you need to know about why these protests are important. See you on the 19th at August Kranti Maidan, Mumbai. The time to protest on social media alone is over. pic.twitter.com/lwkyMCHk2v
— Farhan Akhtar (@FarOutAkhtar) December 18, 2019
CAA विरोधात फरहान अख्तरने केलेल्या ट्विटमुळे हैदराबाद पोलिसांनी त्याच्यावर कलम 121 (सरकार विरोधात युद्ध पुकारणे किंवा युद्धाला प्रोत्साहन देणे), 121 अ (सरकार विरेधात युद्धाचा कट रचणे), 120 ब (गुन्हेगारी कट रचणे) आणि कलम 505 (समाजात तेढ निर्माण करणे) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरहान विरोधात तक्रार करणाऱ्या व्यक्तीचे नाव के करुणा सागर असे असून करुणा सागर हे व्यवसायाने वकील आहेत. देशविरोधी ट्विट फरहानने केल्याचा आरोप या वकीलाने केला आहे.
Well done Mumbai on a peaceful protest today and a special shout out to the @MumbaiPolice for overseeing the safety and security of all gathered. #Respect
— Farhan Akhtar (@FarOutAkhtar) December 19, 2019
फरहान अख्तरने काही दिवसांपूर्वीच CAA विरोधात एक ट्विट केले होते. त्याने लिहिले, या आंदोलनाची गरज का आहे हे जाणून घेण्याची तुम्हाला गरज आहे. 19 डिसेंबरला मुंबईच्या ऑगस्ट क्रांती मैदानात भेटूया. एकट्याने सोशल मीडियावर आंदोलन करण्याचा काळ आता संपला आहे. त्याचबरोबर फरहानने CAA आणि CAB बद्दल सविस्तर माहिती सुद्धा त्याच्या ट्विटमध्ये दिली होती.
फरहान अख्तरवर असा आरोप आहे की, या ट्विटमधून त्याने समाजात भीती निर्माण करण्यासोबतच देशातील मुस्लिम, तृतीयपंथी आणि दलित लोकांना देशाविरोधात भडकवण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच त्याने समाजातील विविध लोकांमध्ये शत्रुत्व पसरवण्याचा प्रयत्न केल्याचाही आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे. फरहान अख्तर व्यतिरिक्त या कायद्याला बॉलिवूडमधील इतर कलाकारांनीही विरोध दर्शवला आहे. यात आयुष्मान खुराना, राजकुमार राव, परिणीती चोप्रा, आलिया भट, स्वरा भास्कर आणि दिग्दर्शक अनुराग कश्यप इत्यादी कलाकारांचा समावेश आहे.