या राज्याच्या असणार तीन राजधान्या !


हैदराबाद : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेंड्डी यांनी नव्या आंध्र प्रदेश राज्याच्या तीन अधिकृत राजधान्या असतील, अशी घोषणा केली आहे. हा निर्णय सत्तेचे आणि कामकाजांचे विकेंद्रीकरण करण्यासाठी घेतला असल्याचे बोलले जात आहे. सध्या तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या दोन्ही राज्यांची हैदराबाद हीच राजधानी आहे. पण आंध्र प्रदेशने आता स्वतःची वेगळी राजधानी निर्माण करत असल्याची घोषणा केली आहे.

मंगळवारी विधानसभेत आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी माहिती दिली की, तीन राजधान्या आंध्र प्रदेश राज्याच्या असतील. वेगवेगळ्या प्रकारची कामे या तीन राजधान्यांमधून केली जातील. कार्यकारी, न्यायिक, राजकीय अशा तीन प्रकारच्या या राजधान्या असतील. त्यासाठी तीन वेगवेगळ्या शहरांची निवड केली जाणार आहे.

राज्याच्या राजधानीबाबत विधानसभेत मुद्दे उपस्थित करण्यात आले होते. मुख्यमंत्र्यांनी त्यावर उत्तर देताना याबाबतची माहिती दिली. रेड्डी म्हणाले की, अमरावती ही राजकीय राजधानी असेल. विधीमंडळाचे कामकाज अमरावतीमधून केले जाईल. तर विशाखापट्टणम ही कार्यकारी राजधानी असेल. कुरनूल शहर हे आंध्र प्रदेशची न्यायिक राजधानी असेल. आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचे कामकाज येथूनच चालेल.

जगनमोहन रेड्डी यांनी सांगितले की, तीन राजधान्या राज्याच्या असाव्यात, असा आमचा विचार आहे. आम्हाला त्याची आवश्यकता वाटते. आम्ही यावर गंभीरतेने विचार करत आहोत. रेड्डी यांनी याचवेळी असेही सांगितले की, एक तज्ज्ञांची समिती तीन राजधान्यांबाबत विचार करण्यासाठी गठित करण्यात आली आहे. अंतिम निर्णय या समितीच्या अहवालानंतरच घेतला जाईल. समितीचा अंतिम अहवाल येत्या काही दिवसांमध्ये येईल.

दरम्यान, सचिवालय आणि विभागीय कार्यालये लवकरच विशाखापट्टणममध्ये स्थलांतरित केले जाण्याचे यावेळी रेड्डी यांनी संकेत दिले आहेत. रेड्डी म्हणाले की, विशाखापट्टणम हे उत्कृष्ट बंदर असून तेथील व्यवस्था चांगली आणि चोख आहे. तिथे केवळ मेट्रोची आवश्यकता आहे.

Leave a Comment