मेरठचे नाव बदलण्याचा कोणताही विचार नाही; योगी सरकारचे स्पष्टीकरण


लखनऊ – उत्तर प्रदेशमधील योगी सरकारने मेरठचे नाव पंडित नथुराम गोडसे नगर करण्याचा विचार नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. योगी सरकार मेरठसह तीन जिल्ह्यांचे नामांतर करणार असल्याचे वृत्त विविध माध्यमांमधून प्रसिद्ध झाल्यानंतर हे स्पष्टीकरण सरकारने दिले.

आपल्या निवेदनात उत्तर प्रदेश सरकारने स्पष्ट केले की, सरकारचा गाझियाबाद, मेरठ आणि हापूर जिल्ह्यांची नाव बदलण्याचा कोणताही विचार नाही. सरकारने म्हटले की, एकिकृत तक्रार निवारण प्रणाली (IGRS) हे सरकारी ऑनलाईन तक्रार निवारण प्रणाली आहे, जी ऑटो रिस्पॉन्स मोडवर चालते आणि यामध्ये दाखल झालेल्या तक्रारी आणि मागण्या स्वयंचलितपद्धतीने संबंधीत जिल्हा प्रशासनाकडे पाठवून देते. त्यामुळे अशा प्रकारचा कुठलाही प्रस्ताव सरकारने संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवलेला नाही.

मेरठ जिल्ह्याचे नाव बदलून पंडित नथुराम गोडसे नगर, गाझियाबादचे नाव महंत दिग्विजय नगर आणि हापूर जिल्ह्याचे नाव महंत अवैद्यनाथ नगर असे नामांतर करण्याचे अनेक प्रस्ताव उत्तर प्रदेश सरकारच्या एकिकृत तक्रार निवारण प्रणालीद्वारे प्रशासनाकडे आले होते.

Leave a Comment