नागरिकत्व विधेयका विरोधात शिवसेनेने एमआयएमला साथ द्यावी


औरंगाबाद – दुपारी धर्मनिरपेक्षतेची आणि सायंकाळी हिंदुत्वाची भूमिका शिवसेनेने मांडू नये. आता काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत शिवसेना राज्याच्या सत्तेत आली आहे. शिवसेनेने तेव्हा नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला विरोध करण्याच्या मुद्यावर एमआयएमसोबत येण्यास काही हरकत नसल्याचे आवाहन खासदार इम्तियाज जलील यांनी केले आहे. पण तुम्ही काँग्रेसला नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाच्याच मुद्यावर साथ देणार का, या प्रश्नावर थेट उत्तर न देता, सरकारविरोधात कोणासोबतही आम्ही पक्षीय भेद विसरून रस्त्यावर उतरण्यास तयार असल्याचे खासदार जलील यांनी सांगितले. येत्या २० डिसेंबर रोजी एमआयएमकडून जिल्हास्तरावर काढण्यात येणाऱ्या मोर्चामध्ये सर्व धर्मनिरपेक्ष पक्ष, संघटनांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.

एमआयएमची नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाविरोधात भूमिका स्पष्ट करण्यासाठी औरंगाबाद येथे रविवारी आयोजित पत्रकार बैठकीत जलील बोलत होते. विधेयकावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्यावर खासदार जलील यांनी टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, बहुमताच्या जोरावर मोदी आणि शहा यांनी देशात आपण करू तोच कायदा, या पद्धतीने कारभार हाकण्यास सुरुवात केली आहे. सुरुवातीला ट्रिपल तलाक, त्यानंतर ३७० कलम आणि आता नागरिकत्व दुरुस्ती विधेयक मांडले आहे. त्याचेही पडसाद संपूर्ण देशात आता उमटत आहेत.

आसामनंतर नागरिकत्व दुरुस्ती विधेयक कायदा लागू करण्यास केरळ, पश्चिम बंगाल या राज्यांनी विरोध दर्शवला आहे. विशिष्ट घटकाला या कायद्याद्वारे त्रास देण्याचा केंद्राचा स्पष्ट उद्देश दिसत आहे. देशाची अखंडता अबाधित ठेवायची असेल तर या नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला विरोध करणे योग्यच असल्याचे मतही त्यांनी मांडले. या विधेयकामुळे आता विनोदातही आम्हाला पाकिस्तानात जावे लागेल, असे बोलले जात आहे. त्यातला विनोदाचा भाग सोडला तरी त्याआडून मोदी आणि शहा हे भय पसरवत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

Leave a Comment