वर्धा : आपले होम ग्राऊंड असलेल्या बारामतीमधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी पुन्हा एकदा लोकसभा निवडणूक जिंकली. पण त्यांनी आता बारामतीऐवजी वेगळ्याच मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. सुप्रिया सुळेंनी भविष्यात संधी मिळाली तर वर्ध्यातून लोकसभेची निवडणूक लढण्याची इच्छा बोलून दाखवली. त्याचवेळी सध्या तरी असा विचार आपण करत नाही, तुम्ही चिंता करु नका, असे सुप्रिया सुळेंनी म्हणत वर्ध्याचे खासदार रामदास तडस यांना आश्वस्त केले.
या मतदारसंघातून सुप्रिया सुळेंना लढवायची आहे निवडणूक
आपण आधीपासूनच वर्ध्याच्या मोहात वर्ध्यातील पवनार आणि सेवाग्राम आश्रम आणि येथे असलेला गांधी सहवास यामुळे पडलो असल्याचे सुप्रिया सुळेंनी सांगितले. तसेच वयाची ६० वर्ष पार केली तर महिन्यातील १० दिवस पवनार आश्रमात देणार, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
जी काही माझी राजकारणात आणि समाजकारणात ओळख आहे ती बारामतीमुळेच आहे. मी असे बोललेले बारामतीकरांना आवडणार नाही, पण जर कधी चॉईस करायची वेळ आली आणि बारामतीमधून दुसरा खासदार उभा राहिला तर मला आवडणारा जिल्हा आणि मतदारसंघ वर्धा असल्याचे वक्तव्य सुप्रिया सुळेंनी केले आहे.
सुप्रिया सुळेंनी विदर्भ माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या मुख्याध्यापकांच्या राज्यस्तरीय शैक्षणिक संमेलनांचे उद्घाटन केले. त्यांनी हे वक्तव्य वर्ध्यात झालेल्या या कार्यक्रमात केले आहे. खासदार दत्ता मेघे, खासदार रामदास तडस, आमदार विक्रम काळे, आमदार पंकज भोयर आणि आमदार दीपकराव दौंदल या कार्यक्रमाला उपस्थित होते.