गिरिडीह (झारखंड): केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी नागरिकत्व दुरुस्ती विधेयक मंजुर झाल्यानंतर देशभरात विशेषत: ईशान्य भारतात उद्रेक झाल्याच्या पार्श्वभूमीवर या कायद्यात बदल करण्याचे संकेत दिले आहेत. अमित शहा यांनी हे संकेत झारखंडमधील गिरिडीह येथे एका निवडणूक सभेत संबोधित करताना दिले आहेत. या कायद्यात बदल करावेत असे आपल्याला मेघालयचे मुख्यमंत्री कोनराड संगमा यांनी सांगितल्याचे अमित शहा यांनी सभेत बोलताना सांगितले. ख्रिसमसनंतर संगमा यांना आपली भेट घ्यावी असेही सांगितल्याचे शहा म्हणाले. मेघालयसाठी सर्जनशील पद्धतीने काही उपाय करू शकतो का याचा विचार केला जाऊ शकतो असे, शहा म्हणाले. या कायद्यामुळे कुणालाही घाबरण्याचे कारण नसल्याचेही शहा म्हणाले.
नागरिकत्व दुरुस्ती कायद्यात बदल करण्याचे शहांनी दिले संकेत
आम्ही या पूर्वी लोकांच्या संरक्षणासाठी वचनबद्ध असल्याचे वक्तल्य मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी केले. नागरिकत्व कायद्यावरील शहा यांचे हे वक्तव्य अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. आमच्या राज्यात नागरिकत्व कायद्याची अंमलबजावणी करणार नाही, असे पश्चिम बंगाल, केरळ, पंजाब, महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या राज्यांनी आधीच स्पष्ट केले आहे.
काँग्रेस पक्षाने नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाविरुद्ध हिंसा पसवली असा थेट आरोप शहा यांनी या सभेत केला. नागरिकत्व संशोधन विधेयक आम्ही आणल्यामुळे काँग्रेस पोटात दुखत आहे. काँग्रेस या विरोधात हिंसा पसरवण्याचे काम करत असल्याचेही शहा म्हणाले. ईशान्य भारतातील संस्कृती, भाषा, सामाजिक ओळख आणि राजकीय अधिकारांवर या कायद्यामुळे कोणत्याही प्रकारचा परिणाम होणार नाही, असेही शहा म्हणाले.