नाथाभाऊंसह पंकजा मुंडेंवर तरुण भारतमधून ताशेरे


नागपूर – राज्याचे माजी मंत्री पंकजा मुंडे आणि ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे सैरभैर झाले असून ते दोघेही अहंकारी आहेत. आपल्या अंहकारीपणामुळे झालेल्या पराभवाचे या दोघांना आत्मपरिक्षण करता येत नसल्याचे म्हणत, पंकजा मुंडे आणि एकनाथ खडसेंवर निशाणा संघ विचारांच्या तरुण भारत या वृत्तपत्रातून साधला आहे.

पंकजा मुंडे आणि एकनाथ खडसे यांनी गोपीनाथ गडावर झालेल्या स्वाभिमान मेळाव्यात पक्षनेतृत्वावर निशाणा साधला होता. आपल्याला पक्षातून बेदखल केले जात असल्याचे वक्तव्य दोघांनीही केले होते. आज तरुण भारतने त्यांच्या या टिकेवर पलटवार केला आहे. पंकजा मुंडे आणि एकनाथ खडसे यांनी गोपीनाथ गडावर केलेले भाषण अयोग्य असल्याचे तरुण भारतमध्ये म्हटले आहे.

तरुण भारतमधून भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याचेही म्हटले आहे. कारण त्यांनी गोपीनाथ गडावर केलेल्या भाषणातून तसे स्पष्ट संकेत दिले आहेत. माझ्यावर पक्षाने भरोसा ठेवू नये, असे एकनाथ खडसे म्हणाले होते. तसेच आम्हाला पक्षातून तुम्ही जा अशी परिस्थिती निर्माण केल्याचे खडसे म्हणाले. तर पंकजा मुंडेंनीही पक्ष सोडण्याचे मन बनवल्याचे तरुण भारतने म्हटले आहे.

काळाची पावले पंकजा मुंडे आणि एकनाथ खडसे यांनी ओळखली नाहीत, म्हणूनच त्यांची ही अवस्था झाल्याचेही तरुण भारतमधून म्हटले आहे. मतदारांच्या अपेक्षा, मानसिकता बदलत चालल्या आहेत. दोघांनाही याची जाण नाही. गेल्या ५ वर्षातील आपले बोलणे, वागणे, कार्यकर्त्यांशी संवाद हे कसे होते हे त्यांनी पाहणे गरजेचे असल्याचे तरुण भारतने म्हटले आहे.

Leave a Comment