भाजपने आता दारे उघडी ठेऊ नयेत – संजय राऊत


मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ‘एबीपी माझा’ या वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शिवसेनेने जनमताचा अनादर करुन अपेक्षा भंग केल्याची टीका केली होती. त्यावर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी त्याला प्रत्युत्तर देताना आम्ही त्यांच्या कोणत्याही वक्तव्याकडे गांभीर्याने पाहत नसल्याचे म्हटले आहे. त्याचबरोबर त्यांच्यासोबतची चर्चेची वेळ आता निघून गेली असल्यामुळे चर्चेसाठी आता कुणीही दारे उघडी ठेवू नयेत, असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे.

विरोध पक्षनेते म्हणून देवेंद्र फडणवीस बोलत आहेत. राज्याला त्यांच्याकडून वेगळ्या अपेक्षा आहेत. त्यांचा डीएनए आणि आमचा डीएनए विरोधी पक्षाचा असल्यामुळे आमचे चांगलाच जमेल, असे संजय राऊत म्हणाले. भाजपची दारे शिवसेनेसाठी उघडी असल्याचे मुलाखती दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते. संजय राऊत यांनी यावर बोलताना म्हटले की, आता दरवाजे उघडी ठेवली आहेत. पण जेव्हा दारे उघडायची होती, तेव्हा कडी-कुलूप लावून बसले. ठरलेल्या ज्या गोष्टी ते स्वीकारायला तयार नव्हते. त्यांनी हे चित्र कसे निर्माण झाले याचा विचार केला पाहिजे. चांगल्या विरोधी पक्षाची राज्याला परंपरा आहे. देवेंद्र फडणवीस यांनी ही परंपरा पुढे न्यावी. शिवसेनेचे उमेदवार विधानसभा निवडणुकीत पाडण्याचा प्रयत्न झाले. पण आता आम्हाला त्यामध्ये पडायचे नाही. तो कालखंड संपला असल्यामुळे कुणीही आता कुणासाठी दरवाजे खुले ठेवू नयेत, असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे फोटो लावून विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने निवडणूक लढवली त्याचा फायदा झाल्याचा उल्लेखही देवेंद्र फडणवीस यांनी मुलाखतीत केला होता. नरेंद्र मोदींचे फोटो लावणे गुन्हा नाही. कारण त्यावेळी आम्ही महायुतीमध्ये होतो. त्यामुळे कोणकोणाचे फोटो लावून मत मागितले हे कशाला बोलायचे. भाजप पक्ष बाळासाहेबांचे फोटो लावून वाढला असल्यामुळे कोण कुणाचे फोटो लावून वाढतो, या वादात पडायला नको, असेही संजय राऊत म्हणाले.

आम्ही जर विधानसभा निवडणूक वेगळे लढलो असतो, तर 100 पेक्षा जास्त जागा आम्हीसुद्धा जिंकल्या असत्या. हा प्रत्येकाच्या आत्मविश्वासाचा प्रश्न आहे. त्यावर आता चर्चा करणे व्यर्थ आहे. मात्र यावर चर्चा करण्यापेक्षा राज्यातील प्रश्नाकडे आता गांभीर्याने पाहिले पाहिजे, असे देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून संजय राऊत म्हणाले. तसेच आता ज्या भूमिका मिळाल्या आहेत, त्या आम्ही निभावू, असे संजय राऊत यांनी म्हटले.

भाजपच्या नेतृत्वावर संजय राऊत टीका करतात, त्यामुळे त्यांच्यावर देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यावर बोलताना, कोणावरही मी व्यक्तिगत टीका करत नाही. माझ्या मनात नरेंद्र मोदींबद्दल आदर आहे. मी धोरणांवर टीका नाही तर भूमिका मांडतो. माजी पंतप्रधान पंडित नेहरु, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्यावर भाजप नेते सातत्याने टीका करतात. पण देश घडवण्यामध्ये त्यांची मोलाची भूमिका महत्त्वाची होती, हे विसरुन चालणार नाही. पाच वर्षात भारत उभा राहिलेला नाही. हा देश साठ वर्षात अथक प्रयत्नातून उभा राहिला आहे. देश घडवण्यामध्ये काँग्रेसचेही योगदान आहे. त्यामुळे त्यांना त्यांचा वाटा मिळायला हवा, असेही संजय राऊत म्हणाले.

Leave a Comment